वनमंत्र्यांचे आदेश; फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या वृक्ष लागवडीची होणार चौकशी
मुंबई | महाईन्यूज
देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात केलेल्या वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी वृक्षलागवडीच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ३३ कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार आहे. वृक्ष लागवडीमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात वृक्ष लागवड योजना राबविली होती.
मात्र राज्यातील काही ठिकाणी या वृक्ष लागवडीत अनियमित्ता झाल्याच्या काही आमदारांनी वनमंत्र्यांकडे तक्रारी केल्या होत्या. यामध्ये राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुध्दा त्यांच्या मतदार संघात वृक्षलागवडीमध्ये अनियमत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, वृक्ष लागवडीमध्ये अनियमत्ता असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ज्या ठिकाणावरुन तक्रारी आल्या आहेत. त्या ठिकाणच्या वृक्ष लागवडीची चौकशी करा, असे आदेश वन विभागाचे प्रधान सचिव व्ही बी रेड्डी यांना वनमंत्र्यांनी दिले आहे. वनमंत्र्यांच्या या आदेशामुळे पुन्हा राजकारण तापले आहे.