महामोर्चातून संजय राऊतांचा सूचक इशारा… रणनीती ठरली, फेब्रुवारीत शिंदे फडणवीस सरकार कोसळणार!
मुंबई ः ‘आजच्या विराट मोर्चाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना डिसमिस केलेले आहे. या मोर्चाने इशारा दिला आहे की, शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही,’ असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या महामोर्चात जमलेल्या समूदायाला संबोधित करताना संजय राऊत बोलत होते.
‘या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा, जोतिबा फुले, सावित्रीमाई फुलेंचा अपमान करून कोणी सत्तेत बसू शकेल का? शिंदे फडणवीस यांना एक मिनिटसुद्धा या सरकारमध्ये बसण्याचा अधिकार नाही,’ असं संजय राऊत म्हणाले. ‘आज दिल्लीसुद्धा दुर्बिणीतून बघत असेल की महाराष्ट्राची ताकद काय आहे? आज महाराष्ट्र जागा झाला आहे. आज महाराष्ट्र पेटला आहे, आज ठिणगी पडली आहे, असं म्हणत राऊतांनी केंद्रावरही निशाणा साधला.
‘या व्यासपीठावरील प्रत्येक नेता महाराष्ट्रप्रेमी आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे नेते मंत्रालयात बसले आहेत. हा महाराष्ट्राचा सर्वांत मोठा अपमान आहे. महाराष्ट्रातील साडेअकरा कोटी जनता वाट पाहतेय की हे सरकार केव्हा उलथवून टाकायला मिळतेय. हा मोर्चा म्हणजे सरकार उलथवून टाकण्याचं पहिलं पाऊल आहे. या सरकारविरोधात प्रखर आंदोलन झाल्याशिवाय राहणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्राचा रंग एक झाला आहे. शिवसेनेचा भगवा, काँग्रेसचा तिरंगा, सपाचा लाल रंग मिळून एक रंग झाला आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
हा समोर दिसतोय तो रावण गाडण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. व्यासपीठावर सर्व प्रमुख नेते आहेत. रणनीती ठरली आहे, रणशिंग फुकलं आहे. आता फक्त आपल्याला ही फौज युद्धासाठी सज्ज करायची आहे. कर्नाटकचा मुख्यमंत्री बोम्मई रोज महाराष्ट्राच्या बदनामी करतो. तिकडे चीनविरोधात लढण्याची भाषा करत आहेत आणि इथे मराठी बांधवांचा अपमान करत आहेत. म्हणून आपण ज्या लढाईची सुरुवात केली आहे, त्यामुळे सरकार हतबल झाले आहे, लटपटायला लागला आहे. हा महाराष्ट्र एक आहे, अखंड आहे. हे सांगण्यासाठीच हा मोर्चा आहे. ते सांगण्यासाठी ही विराट समूदाय येथे उपस्थित आहे, असं संजय राऊत म्हणाले.