मुख्यमंत्र्यांचा स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते – राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात भगवा एकहाती फडकला पाहिजे असे म्हटले होते. त्यावरुन भाजपने मुख्यमंत्र्यांना टोला लगावण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते असं वक्तव्य भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत.” असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहेत. तर चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की, मुख्यंमंत्र्यांनी भगव्या ऐवजी तिरंगा फडकवू असे म्हणायला हवे होते.
एवढंच नाही तर केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “केंद्र सरकारवर टीका करणं म्हणजे स्वतःचं अपयश झाकायचं आणि केंद्राकडे बोट दाखवायचं असा प्रकार आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? ” असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना भेटण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.