“राज्य सरकार दाऊदचे समर्थन…;” सरकारच्या ‘त्या’ भूमिकेवरून चंद्रकांत पाटलांचा आरोप
पुणे |
नबाब मलिक यांच्यावर ईडीच्या कारवाईनंतर अटकेची कारवाई झाली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकले असतानाही त्यांचा राजीनामा घेण्यास नकार देणे म्हणजे राज्यातील सरकार दाऊदचे समर्थन करत आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी कोल्हापूर येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. शिवसेना नेते माजी वन मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू करू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “ईडीच्या कारवाईनंतर मंत्री नबाब मलीक यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. देशद्रोही खटल्यात मलिक अडकले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे त्यांचा राजीनामा घेत नाहीत. याचा अर्थ हे सरकार दाऊदचे समर्थन करते. मलिक यांच्या अटकेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळ निदर्शने, धरणे आंदोलन करते हे आश्चर्यकारक आहे. मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपा आंदोलन सुरू ठेवेल. मलिक यांनी खरेदी केलेली तीनशे कोटीची मालमत्ता ही दाऊदसाठीच होती,” असा आरोपही यावेळी पाटील यांनी केला.