कौशल्य शिक्षणासाठी राज्याचा इन्फोसिससोबत सामंजस्य करार, ४० लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा
मुंबई – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण मिळावे आणि त्यांची रोजगार क्षमता वाढावी यासाठी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने इन्फोसिसबरोबर सामंजस्य करार केला आहे. याचा फायदा जवळपास ४० लाख विद्यार्थी आणि एक लाख प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
इन्फोसिसच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाअंतर्गत विविध विषयांवरील आणि कालावधीचे सुमारे ३ हजार ९०० ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केले आहेत. ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विनाशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नागपूरमधील कला, विज्ञान व वाणिज्य विद्यालय आणि रत्नागिरी येथील तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. यात भाषा, क्लाऊड तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, बिझनेस कम्युनिकेशन, बिझनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य आदींचा समावेश आहे. या करारामुळे १,६०० महाविद्यालयांमधील १० लाख विद्यार्थी आणि उच्च शिक्षण संचालनालयाच्या ३ हजार महाविद्यालयांमधील ३० लाख अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.