इशानच्या शतकाने इतिहास रचला; झारखंडने पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली

SMAT 2025 Final | सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ स्पर्धेत झारखंड संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात हरियाणाचा पराभव करत इशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंडने ट्रॉफीवर आपले नाव कोरले. हरियाणा आणि झारखंड यांच्यात पार पडलेल्या अंतिम सामन्यात हरियाणाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय त्यांना महागात पडला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या झारखंड संघाने २० षटकांत ३ गडी गमावत तब्बल २६२ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली.
झारखंडकडून कर्णधार इशान किशन याने स्फोटक फलंदाजी करत ४९ चेंडूत १०१ धावांची शतकी खेळी साकारली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १० षटकार ठोकले. त्याला कुमार कुशाग्रने भक्कम साथ देत ३८ चेंडूत ८१ धावांची तुफानी खेळी केली. शेवटच्या षटकांत अनुकूल रॉयने नाबाद ४० तर रॉबिन मिंझने नाबाद ३१ धावांचे योगदान दिले.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक, त्यांचा पक्ष संपुष्टात येईल; भाजप नेत्याचे वक्तव्य
२६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हरियाणाच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली. यशवर्धन दलालने ५३ तर सामंत जाखरने ३८ धावा करत संघाला आशा निर्माण करून दिली. मात्र झारखंडच्या गोलंदाजांसमोर हरियाणाचा डाव १८.३ षटकांत १९३ धावांवर आटोपला आणि झारखंडने ऐतिहासिक विजय नोंदवला.
हरियाणा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता, तर झारखंडलाही पहिल्यांदाच जेतेपद जिंकण्याची संधी मिळाली होती. या संधीचे झारखंडच्या फलंदाजांनी पुरेपूर सोने केले. ही सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेची १८ वी आवृत्ती होती. आतापर्यंत तामिळनाडू संघाने सर्वाधिक तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई, कर्नाटक, वडोदरा आणि गुजरात यांनी दोन वेळा, तर ईस्ट झोन, महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, दिल्ली आणि आता झारखंड यांनी प्रत्येकी एक वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळवले आहे.





