breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीलेख

महाराष्ट्रातील ‘या’ गावात साडेआठशे वर्षांपासून ‘‘श्रावण’’

जळगाव: श्रावण महिना हा हिंदू धर्मात पवित्र असा महिना समजला जातो. या महिन्यात आपण मासांहार करत नाही किंवा दारुचं व्यसन असेल तर ते सुध्दा महिनाभरासाठी बंद ठेवतो. मात्र एक महिना, एक वर्ष नव्हे तर तब्बल साडे आठशे वर्षांपासून मांसाहार न करणारं, तसेच गावातील कुठल्याही व्यक्तीला दारुचं व्यसन नसेल, असं एक गाव आहे, असं जर तुम्हाला सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण, हे खरं आहे. जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील ‘कनाशी’ असं या गावाचं नाव आहे. एवढचं काय तर या गावात मासे, बकऱ्या, कोंबड्या सुध्दा पाळल्या जात नाहीत. तब्बल साडे आठशे वर्षांपासून या गावाने शाकाहाराची परंपरा जपली असून, अशा पध्दतीने हे राज्यातलं एकमेव गाव असल्याचं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

गिरणा नदी काठावर असलेल्या भडगाव तालुक्यातील ३ हजार लोकवस्तीचं हे कनाशी हे गाव… या गावात साधारणता १२ व्या शतकात चक्रधर स्वामी हे आल्याचा इतिहास असल्याचं गावातील चक्रधर स्वामी यांचे आश्रमातील निवासी महानुभव पंथाचे महंत लांडगे महाराज सांगतात. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याने चक्रधर स्वामी म्हणजेच महानुभाव पंथाचे आचार विचार येथील संपूर्ण गावकऱ्यांनी स्विकारले असल्याचंही ते म्हणतात. गावात चक्रधर स्वामीचं भव्य असं मंदीर, तसेच आश्रम आहे. याठिकाणी देशभरातून महानुभव पंथांचे अनुयायी दर्शनासाठी येत असतात.

ज्या दिवसापासून गावात चक्रधर स्वामी येवून गेले आहे, त्या दिवसापासून ते आजतागायत या गावातील एकाही ग्रामस्थाने केलेला नाही, तसेच कोणी मद्यापनही करत नाही. तब्बल आठशे वर्षांपासून संपूर्ण गाव हे शाकाहाराची परंपरा पाळतंय. एवढचं नाही तर मांसाहाराला कारण असलेले प्राणी म्हणजेच कोंबडी आणि बकरी सुध्दा या गावात पाळली जात नाही. असेही लांडगे महाराज सांगतात.

गावातील दुकानांसह, विकासो, दूध डेअरीचे नाव चक्रधर स्वामीच

चक्रधर स्वामींना माणणारे हे संपूर्ण गाव आहे. तर चक्रधर स्वामींच्या विचारांचाही या गावातील ग्रामस्थांवर पगडा आहे. त्यामुळे या गावातील दुकाने, विकास सोसायटी तसेच दूध डेअरी यांचे नाव सुध्दा चक्रधर स्वामी यांच्याच नावाने असल्याचं पहायला मिळतं. गावातील प्रत्येक घराघरात पिढ्यांपासून शाकाहारांचं पालन केलं जातं. यात गावात लग्न करुन आलेल्या सूना जर मांसाहार करत असतील तर त्यासुध्दा सासरच्या परंपरेनुसार शाकाहारी होवून जातात आणि कायमचं शाकाहाराचं पालन करतात, असं गावातील नागरिक सांगतात.

एखाद्या आजारावर डॉक्टरांनी सांगितलं असेल, तरीही येथील लोक मांसाहार करत नाही, असे सुध्दा नागरिकांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात मांस कसं असतं, कसं दिसतं, अंडी कशी असतात कशी दिसतात हे पाहिलेलं नसल्याचे जेव्हा येथील ग्रामस्थ सांगतात तेव्हा मात्र नवल वाटल्याशिवाय राहत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या गावातील प्रत्येक ग्रामस्थ हा शाकाहारांचं पालन करत आहे. तर संपूर्ण गावात कुणालाही दारुचं व्यसन सुध्दा नाही. यामुळेच कनाशी या छोट्याशा गावाची राज्यात अनोखी ओळख असून पिढ्या न पिढ्या शाकाहाराचं पालन करणारं राज्यातलं एकमेव गाव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button