पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना शरद पवारांचा टोला; म्हणाले..
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांची व शेती परिस्थिती यावर सविस्तर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. शरद पवार सोलापुरच्या माढा दौऱ्यावर होते.
शरद पवार म्हणाले, सोलापूर जिल्हा हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा. मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळी पाहणी करायला इंदिरा गांधी याठिकाणी आल्या होत्या आणि कधीही न पाहिलेले एवढे मोठे संकट तेव्हा आम्ही पाहिले. ५ लाख लोक दुष्काळी भागात काम करण्यासाठी जात होते त्यांचा पगार आणि बाकीची व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱ्यांना रात्रीच्या ३-३ वाजेपर्यंत बसावे लागत असत या सर्वांचा आठवड्याचा पगार काढणं ही काही साधी गोष्ट नव्हती. त्यावेळी अनेक सहकारी मदतीला होते.
राज्य, केंद्र सरकारच्या संबंधित इथे अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण यापैकी मी कुठेच नाही परंतु काळजी नसावी मी कुठेच नसलो तरी सर्व ठिकाणी आहे, जी काही दुखणे असतील त्या सर्वांची नोंद मी घेतली आहे आणि यानंतर प्रमुख सहकाऱ्यांना सोबत घेऊन या जिल्ह्यातील जे-जे काही शेतीसंबंधी प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला राज्य व केंद्र सरकार यांच्याशी काय बोलावे आणि त्यातून तुमची सुटका कशी होईल यासंबंधी चर्चा करेन, असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – राज्यात थंडीचा कडाका वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज
देशाचे प्रधानमंत्री यांनी असा उल्लेख केला की, मला शेतीतलं काय समजतं पण हे काही नवीन नाही त्यामुळे ते जाऊ देत. काही दिवसांपूर्वी निवडणुकीआधी अमित शहा नावाचे गृहस्थ या जिल्ह्यात आले होते तेव्हा त्यांनी असेच सांगितले की, शरद पवार को क्या समझता है? लोकांनी त्यांच्या उमेदवारांचा पराभव केला आणि सांगितलं की, त्यांना हे समजतं व नीटनेटकं समजतं. राजकारण या ठिकाणी काढायचं नाही, असं शरद पवार म्हणाले.
अलीकडेच एक गोष्ट ऐकायला मिळाली की, काही ठिकाणी राजकारणामध्ये त्यांच्या मनासारखं काम केलं नाही तर दबाव आणतात. दबावाने आज चांगलं काम करणाऱ्याला त्याच्या कामापासून बाजूला करायचं काम करतात. मी एवढेच सांगू इच्छितो की, जसं कर्जमाफीत कुणाला फसवणूक केली असेल किंवा प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत म्हणून दबावाचे राजकारण या ठिकाणी कुणी करत असेल तर तो दबाव सुद्धा संपवायचा कसा ? याचा विचार आम्ही करू, असंही शरद पवार म्हणाले.