‘तुमच्याकडे बहुमत होतं तर मला का विचारलं?’ शरद पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबई : २०१९ ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून आता शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
शरद पवार म्हणाले, आम्ही सत्तेत नव्हतो. भाजपा सत्तेत होता. त्यांच्याकडे जास्त आमदार होते. भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांचाच होता. भाजपाकडे बहुमत होतं, तर त्यांनी मला का विचारालं? भाजपानं राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला? ही चुकीची माहिती आहे. प्रश्न हाच आहे की, भाजपाकडे बहुमत असताना ते माझं का ऐकत होते? असं शरद पवार म्हणाले.
हेही वाचा – ‘अजित पवारांना ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवू’; देवेंद्र फडणवीस यांचा सूचक विधान
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेनं २०१९ मध्ये सरकार स्थापनेसाठी पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला. यामुळे सत्तेवर कोण येणार? असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवारांनी भाजपाशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाने युती करावी, असं सुचवलं. तेव्हा शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचना केली होती. जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपाशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.