मुंबई, पालघरसह सात जिल्ह्यांना पुढील तीन तास पावसाचा इशारा
मुंबई – मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली असून रविवारी रात्रीपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील तीन तास मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. सात जिल्ह्यांत मध्यम ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागरात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत पाऊस कोसळत आहे. तर सक्रिय झालेल्या पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार असून पुढील तीन तासांत राज्यातील सात जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा ते तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.