देशातील ४०टक्के खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल, महाराष्ट्रातील खासदारांवर सर्वाधिक गुन्हे
मुंबई : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने खासदारांविरूद्ध दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणांबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशातील एकूण ७६३ खासदारांपैकी ३०६ खासदारांवर गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी १९४ खासदारांवर खून आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
केरळमधील २९ पैकी २३ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये लोकसभा व राज्यसभेच्या खासदारांचा समावेश आहे. बिहारमधील ५६ पैकी ४१, महाराष्ट्रातील ६५ पैकी ३७, तेलंगणातील २४ पैकी १३ तर दिल्लीतील १० पैकी ५ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यात दोन्ही सभागृहातील खासदारांचा समावेश आहे.
हेही वाचा – ‘मुख्यमंत्र्यांसकट १६ आमदार अपात्र ठरणार, सरकार पडणार..’; अनिल परब यांचा मोठा दावा
भाजपच्या एकूण ३८५ खासदारांपैकी १३९ खासदारांविरोधात गुन्ह्यांची नोंद आहे. काँग्रेसच्या ८१ खासदारांपैकी ४३ खासदारांविरोधात गुन्हे नोंदवले गेले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या ३६ पैकी १४, राष्ट्रीय जनता दलच्या ६ पैकी ५, माकपच्या ८ पैकी ६, आम आदमी पक्षाच्या ११ पैकी ३, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ८ पैकी ३ खासदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे.