‘मुख्यमंत्र्यांसकट १६ आमदार अपात्र ठरणार, सरकार पडणार..’; अनिल परब यांचा मोठा दावा
मुंबई : शिवसेना शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. याबाबतची सुनावणी उद्यापासून सुरू होणार आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोठा दावा केला आहे. हे १६ आमदार अपात्र ठरणार असून सरकार वाचवण्यासाठीच भाजपने राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे.
अनिल परब म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली असून पूर्णपणे अर्थ लावूनच पाठवले आहेत. आता फक्त निर्णय घेणे बाकी आहे. सध्या हे सरकार वेळ काढण्याचा प्रयत्न करीत असले तरी सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांची भूमिका, घटनेतील १० वे कलम या सर्व बाबतीत सांगितले असल्याने पक्षांतर्गत बंदी बाबत सर्व असलेले नियम आता स्पष्ट आहेत. यामुळे सध्या सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा सुरु असून हे १६ आमदार अपात्र होणे म्हणजे सरकार जाणे आहे.
हेही वाचा – ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले..
या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री असून यापाठोपाठ इतर २३ आमदारांचे पिटिशन देखील बाकी असल्याने हा वेळकाढूपणा सुरु आहे. आता सरकार वाचवण्यासाठी म्हणूनच राष्ट्रवादीतील लोकांचा पाठिंबा घेतला. आमच्याप्रमाणे राष्ट्रवादीनेही आता अपात्रतेसंदर्भात कारवाई सुरू केली असल्याचं अनिल परब म्हणाले.
मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मराठा आरक्षणासाठी नव्हते तर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्यासाठी आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला वंशावळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावे अशी त्यांनी मागणी केली आहे, असंही अनिल परब म्हणाले.