‘ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु’; छगन भुजबळांची नाराजी
नाशिक : मनोज जरांगे यांच्या प्रमुख तीनही मागण्या सरकारने मान्य केल्या. मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंच्या मागणीला शनिवारी तीव्र विरोध केला. आज त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधला.
ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. मराठे आता ओबीसींचे वाटेकरी झाले आहेत. ओबीसींमधील भावना चुकीची नाही. मराठा समाजाला कुणबीमध्ये टाकण्याची गरज काय? जर वेगळे आरक्षण देणार असाल तर त्याला आमचा पाठींबा असेल, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
जर मराठा आरक्षण द्यायचे आहे तर त्याला आमचा पाठींबा आहे. पण सगळ्या मराठा समाजाला कुणबी मध्ये टाकण्याचे कारण काय? सरकारकडून हट्ट पुरवण्याचं काम सुरु आहे. पण, ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरले आहे, असेदेखील छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – मोठी बातमी! मनोज जरांगे पाटीलांनी बोलावली गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक
सरकारने मराठा आरक्षण अध्यादेशाचा मसुदा काढल्यानंतर आज छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. आज सायंकाळी ५ वाजता शासकीय निवासस्थानी बैठक बोलावली आहे. आजच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासंदर्भात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. मराठा आरक्षण अध्यादेशाच्या मसुद्यावर ओबीसीसह इतर समाजातील बांधवांनी १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवा असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे.