मोठी बातमी! मनोज जरांगे पाटीलांनी बोलावली गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक
Antarwali Sarathi : मराठा आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवायचा नाही असं मनोज जरांगेंनी ठरवलं होतं. त्यांच्या या संघर्षाला यश मिळालं आहे. मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मनोज जरांगेंना अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर वाशीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलकांनी जल्लोष केला. मुंबईतल्या जल्लोषानंतर मनोज जरांगे काल रात्री आंतरवाली सराटीत दाखल झाले. यावेळी आंतरवाली सराटीत गुलाल उधळत जल्लोषात मनोज जरांगेंचं स्वागत करण्यात आलं. दरम्यान आता मनोज जरांगे स्वत:च्या घरात कधी जाणार याची उत्सुकता असतानाच, जरांगे यांनी आज दुपारी बारा वाजता गावकरी आणि गोदा पट्ट्यातील प्रमुख आंदोलकांची बैठक बोलावली आहे. आंतरवाली सराटी येथे ही बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर सर्व मराठ्यांची एक विजयी सभा आयोजित करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विजयी सभा कुठे आयोजित करायची, कधी करायची यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत गोदा पट्ट्यातील प्रमुख मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
हेही वाचा – ‘देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका’; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
एकीकडे मराठा आरक्षणाचा लढा मनोज जरांगे यांनी जिंकला असल्याचा दावा केला जात असतानाच, दुसरीकडे नाराजीचा सूर देखील पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी सगेसोयरेबाबत मातृसत्ताक प्रमाणे लाभ देण्याची मागणी केली होती. मात्र, सरकराने काढलेल्या अध्यादेशात याचा उल्लेख नसल्याचा आरोप होत आहे. तसेच, आधीच्याच गोष्टी नव्याने देण्यात आल्याचा देखील दावा केला जात आहे. त्यामुळे सरकराने पुन्हा विश्वासघात तर केला नाही ना? असा संशय देखील उपस्थित केला जात आहे. मात्र, हा निर्णय कुठेही चॅलेंज होऊ शकणार नसल्याचा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करताच सरकार कामाला लागले आणि वाशीत पोहचताच जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या. मनोज जरांगे यांच्यासह मराठ्यांच्या लढ्याला यश आले. या यशामुळे राज्यभर, गावागावात दिवाळी साजरी झाली. पेडे वाटून, गुलालाची उधळन, फटाक्याची अतिषबाजी करत विजयी मिरवणुका काढण्यात आल्या. यात मराठा आरक्षणाची कर्मभूमी आंतरवाली सराटी आणि मनोज जरांगे यांची जन्मभूमी मातोरीत देखील फटाके फोडून व गुलाल उधळून आंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. विशेष म्हणजे रात्री उशिरा मनोज जरांगे देखील आंतरवालीत पोहचले. यावेळी जरांगे यांचे देखील जंगी स्वागत करण्यात आले.