काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी तब्बल ५७० जणांना घेतलं ताब्यात; जाणून घ्या कारण
काश्मीर |
काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हत्यासत्र सुरू आहे. श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापिकेसह अन्य एका शिक्षकाची दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या सात दिवसांत दहशतवाद्यांनी सात नागरिकांचा बळी घेतल्याने काश्मीरमधील दहशतीचे सावट गडद झाले आहे. याच पार्श्वभूमिवर सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये समाजविघातक घटकांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.
काश्मीर खोऱ्यात एका आठवड्यात सात नागरिकांच्या हत्येनंतर श्रीनगरमधून सुमारे ७० तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर, संपूर्ण काश्मीरमधून एकूण ५७० लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनेक दगडफेक करणाऱ्यांना आणि इतर समाजकंटकांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, दहशतवाद्यांविरोधातील कारवायांबद्दल समन्वय साधण्यासाठी केंद्राने गुप्तचर विभागाच्या एका उच्च अधिकाऱ्याला श्रीनगरला पाठवले आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादाशी संबंधित कारवायांविरोधात कारवाई करण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून जम्मू-काश्मीरमधील १५ ठिकाणी आतापर्यंत छापे टाकले आहेत.
गुरुवारी झालेल्या हल्ल्यात सुपिंदर कौर आणि दीपक चांद या दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. हे दोघेही श्रीनगरच्या मध्यवर्ती भागातील मुलांसाठीच्या उच्च माध्यमिक शाळेत कार्यरत होते. शाळेत कुणीही विद्यार्थी नव्हते. मात्र, हे शिक्षक ऑनलाइन वर्ग सुरू करण्याच्या बेतात असतानाच सकाळी ११.१५ वाजता दहशतवाद्यांनी या दोघांवर जवळून गोळीबार केला. या हत्याकांडाची बातमी पसरताच काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भीतीदायक वातावरणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जीवाची भीती असल्याने काश्मीरमधील अनेक नागरिक आणि अधिकारी जम्मूसह सुरक्षित ठिकाणी जात असल्याची माहिती समोर आली आहे.