‘आदित्य ठाकरेंचा उद्याचा मुक्काम जेलमध्ये..’; संजय शिरसाट यांचं मोठं विधान
मुंबई : ठाकरे गटाचा उद्या मुंबई महापालिकेवर मोर्चा निघणार आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. यावरून भाजप आणि शिंदे गटाकडून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे ठाकरेंनीच भ्रष्टाचार केला. अन् तरीही आम्ही भ्रष्टाचार विरोधात हे म्हणायचं धाडस कसं होतं? आदित्य ठाकरे यांनीच उद्धव ठाकरे यांना विचारलं पाहिजे मुंबईची अवस्था अशी का झाली? आपला उद्याचा मुक्काम जेलमध्ये असणार हे आदित्य ठाकरे यांना माहीत आहे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आदित्य असो किंवा कुणीही असो.
हेही वाचा – ‘IIT, विद्यापीठात भाषणासाठी जातो तेव्हा संकोच वाटतो कारण..’; नितीन गडकरी
आमच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झालं. आमच्या डेड बॉड्या येतील असं म्हणत धमकावलं गेलं पण दिवसरात्र काम करून हे सरकार आम्ही चालवलं. ज्यांना वाटत होतं हे सरकार तीन महिन्यात जाईल ते लोक आजूनही बोंबा मारतील. पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. संजय राऊत यांना फसवणूक झाली वाटत असेल तर ते दुर्दैव आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.
राष्ट्रवादी आपला पक्ष कधीही फोडू शकते याची प्रचिती आम्हाला आली होती. २०१४ ला असाच प्रयोग झाला होता. राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी शपथ घेतली असती तरी राष्ट्रवादीला सत्तेत राहायचं होतं हे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी जो सिक्सर मारला त्यामुळे शिवसेनेच्या चिंध्या झालेल्या आहेत, असंही संजय शिरसाट म्हणाले.