‘अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील’; रोहीत पवारांची घणाघाती टीका
मुंबई | राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांनी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सुनील तटकरे आज जरी अजित पवार यांच्यासोबत असले, तरी तेव्हा भाजपमध्ये जायची वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे पहिले नेते सुनील तटकरेच असतील असं रोहीत पवार यांनी म्हटलं आहे. ते मुरूड येथे शेतकरी कामगार पक्षाच्या निर्धार मेळाव्यात बोलत होते.
आमदार रोहीत पवार म्हणाले की, राजकारणाच्या सुरूवातीला सुनील तटकरे आधी बॅरीस्टर अंतुले यांच्या सोबत होते. त्यांची साथ सोडली. शरद पवारांसोबत होते त्यांची साथ सोडली. शेकापच्या जयंत पाटील यांच्या सोबत होते. त्यांची साथ सोडली. त्यामुळे वेळ येईल तेव्हा अजित पवारांची साथ सोडणारे सुनील तटकरे हे पहिले व्यक्ती असतील.
हेही वाचा – ‘मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही कारण..’; निर्मला सीतारमण
केंद्रात आणि राज्यात ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार होते. तेव्हा सुप्रिया सुळे खासदार होत्या, पण आपल्या मुलीला डावलून शरद पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना मंत्रीपदे दिली. काही लोकांना राज्यात तर काही लोकांना केंद्रात देखील मंत्रीपद दिले. आज हे नेते त्यांना सोडून गेलेत आणि आम्हाला पवार साहेबांनी काय दिले असा प्रश्न उपस्थित करत फिरत आहेत. आमच्याकडून सत्तेत गेले तेव्हा ९ खासदार आणि ९० आमदारकीची तिकीटांची स्वप्न पाहत होते. आज त्यांना चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. येणारी निवडणूक ही महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. त्यामुळे भाजप पुरस्कृत उमेदवारांना लाखांच्या मताधिक्याने पाडा, असं आवाहन रोहीत पवार यांनी केले.