#RanadeInstituteIssue: राजकीय षडयंत्र असेल तर मोडून काढू: उदय सामंत
पुणे |
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन स्टडिज आणि डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम या दोन विभागांचे विलीनीकरण करून डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन, जर्नलिझम अँड मीडिया स्टडीज असा नवीन विभाग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन विभागांच्या विलीनीकरण करण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून विरोध होतोय. यासाठी सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट नावाची मोहीम देखील चालवली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आहे.
“रानडे इन्स्टिट्यूट ही पत्रकार घडवणारी एक महत्वपूर्ण संस्था असून तिला समृद्ध इतिहास आहे. हे इन्स्टिट्यूट पुणे विद्यापीठाच्या आवारात स्थलांतरित केले जाईल, अशा बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत. अनेक विद्यार्थी संघटनांनी मला रानडे इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळे मी १४ ऑगस्टला त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी इन्स्टिट्यूटला भेट देईन. राजकीय षडयंत्र करून जर हे इन्स्टिट्यूट स्थलांतरीत करण्यात येत असेल तर तो निर्णय मोडून काढू,” असे सामंत म्हणाले. इन्सिट्यूट वाचवण्यासाठी काही माजी आणि आताचे विद्यार्थी ‘रानडे बचाव कृती समिती’ स्थापन करण्यासाठी एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांनी पुणे विद्यापीठाच्या सिनेटमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि काही वरिष्ठ पत्रकारांवर या इन्स्टिट्यूटची जमीन विकण्याचा घाट असल्याचे आरोप केले आहेत.
“हे इन्स्टिट्यूट ५० वर्षांहून अधिक काळापासून पदव्यूत्तर पदवीचे शिक्षण देत आहे. ही पदवी या क्षेत्रातील आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट मानली जाते. विद्यापीठातील काही अधिकारी विद्यापीठात हा अभ्यासक्रम नेण्याची योजना आखत आहे. तिथे डिप्लोमा कोर्सेस चालवण्याचा त्यांचा मानस आहे. असे केल्यास या इन्स्टिट्यूटचे शैक्षणिक मुल्य कमी होईल, असे पत्रकार हर्षल लोहोकरे यांनी द हिंदूशी बोलताना सांगितले. हे इन्स्टिट्यूट शंभर वर्षांपेक्षा जुन्या ब्रिटिशकालीन इमारतीमधून सुरू आहे. इथे १९६४ मध्ये पत्रकारितेचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्राच्या नवोदित पत्रकारांसाठी ग्रामीण भागातील हुशार आणि पत्रकारितेत काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संस्था मार्गदर्शक आहे. या संस्थेने आतापर्यंत अनेक प्रख्यात पत्रकार घडवले आहेत. रानडे इन्स्टिट्यूट मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिकताना नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोईचे आहे. तसेच या ठिकाणी विद्यार्थी, पत्रकार, संपादक यांचा नियमितपणे संपर्क येतो त्यामुळे विद्यार्थांना मार्गदर्शन मिळते.