“…खास त्यासाठी मी पुण्याला गेलो होतो”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली ४० वर्षांपूर्वीची आठवण!
पुणे |
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी अनभिज्ञ आहेत. कधीतरी खुद्द पंतप्रधानच त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगतात आणि त्यातून नव्याने या गोष्टी कळतात. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना शुभेच्छा देणारा व्हिडीओ संदेश पाठवला होता. या संदेशामध्ये बोलताना पंतप्रधानांनी ४० वर्षांपूर्वीची एक आठवण सांगितली आहे.
- “बाबासाहेबांची भूमिका नेहमीच आदर्श”
“बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात शिवाजी महाराजांना जगण्याचा प्रयत्न निष्ठेनं केला आहे. त्यांनी इतिहासासोबतच वर्तमानाची देखील चिंता केली आहे. गोवा मुक्ती संग्रामपासून दादरा नगर हवेलीच्या स्वाधीनता संग्रामापर्यंत त्यांची भूमिका नेहमीच आपल्या सगळ्यांसाठी आदर्श राहिली आहे. त्यांचं कुटुंब देखील या कामात समर्पित राहिलं आहे. तुम्ही आजही शिवसृष्टी निर्मितीच्या अभूतपूर्व संकल्पावर काम करत आहात. शिवाजी महाराजांच्या ज्या आदर्शांना तुम्ही देशासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, ते आदर्श आम्हाला युगानुयुगे प्रेरणा देण्याचं काम करणार आहेत”, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बाबासाहेबांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
- जाणता राजा आणि नरेंद्र मोदी!
दरम्यान, बाबासाहेब पुरंदरेंना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४० वर्षांपूर्वीची आठवण यावेळी सांगितली. पंतप्रधान म्हणाले, “मला आठवतंय की ४ दशकांपूर्वी अहमदाबादमध्ये जेव्हा तुमचे कार्यक्रम व्हायचे, तेव्हा मी नेहमीच त्यांना उपस्थित राहायचो. जाणता राजाच्या सुरुवातीच्या काळात मी एकदा तो कार्यक्रम बघण्यासाठी पुण्याला गेलो होतो. बाबासाहेबांनी नेहमीच प्रयत्न केला आहे की युवकांपर्यंत इतिहास पोहोचायला हवा. याचसोबत खरा इतिहास पोहोचावा यासाठी ते कायम आग्रही राहिले आहेत. याच संतुलनाची आज गरज आहे”, असं मोदी म्हणाले.
- “मी देशाच्या इतिहासकारांना सांगेन…”
“बाबासाहेबांची श्रद्धा आणि त्यांच्यामधल्या साहित्यकारानं कधीही त्यांच्या इतिहासाच्या आकलनाला प्रभावित केलं नाही. मी देशाच्या इतिहासकारांनाही सांगेन की जेव्हा केव्हा तुम्ही स्वातंत्र्याचा इतिहास लिहाल तेव्हा प्रेरणा आणि प्रामाणिकपणाची हीच कसोटी तुमच्या लेखनात असायला हवी”, असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं.