‘..तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’; राधाकृष्ण विखे पाटलांची मागणी
मुंबई : मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष चालू आहे. छगन भुजबळ मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत आहे. त्यामुळे भुजबळ यांना मराठा आंदोलकांकडून विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भुजबळांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ओबीसीचा मुद्द पुढे करून सुरू केलेल्या आंदोलनाची गरजच नव्हती. मराठा आरक्षणावरून ओबीसी विरूद्ध मराठा हा वाद निरर्थक आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी संयम बाळगण्याची गरज आहे. आज त्यांच्याबद्दल लोकं आदराने बोलतात पण पुढे त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करावी लागेल. एवढेच असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन बाहेर येऊन बोलले पाहिजे.
हेही वाचा – थेरगावमध्ये उद्यानांची दुरावस्था, अधिका-यांचे दुर्लक्ष: खासदार श्रीरंग बारणे
मंत्रिमंडळातीलच नेते असे वक्तव्य करत असतील तर सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा संदेश नागरिकांमध्ये जातो. सरकारबाबतची विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे एक तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे नाहीतर त्यांच्या बाबत वेगळी भूमिका घेण्याबाबत सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता आपण मराठा समाजासाठी आरक्षण द्यायला हवे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
अवकाळीने शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश मुख्यमंत्रयांनी दिले आहेत. ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल. याशिवाय आणखी काही मदत करता येईल का दृष्टीने विचार सुरू आहे, असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.