वैष्णवी प्रकरणात फरार सासरा-लेकाबाबत उदय सामंतांचं मोठं आश्वासन
आरोपांनी शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे

पुणे : पुण्यातील विवाहिता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तिच्या लग्नात माहेरच्यांनी तब्बल 51 तोळे सोनं दिलं होतं. तसेच एक फॉर्च्यूनर कारही दिली होती. मात्र सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळून तिने जीवन संपवलं आहे. याच प्रकरणात आता शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांना मोठं आश्वासनं दिलं आहे.
मूक व्यक्ती एखाद्या पक्षात असली म्हणजे..
वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. हा नीचपणाचा तसेच क्रुरतेचा कळस आहे. या प्रकरणात ज्यांचा हात आहे, त्यांना कठोर शिक्षा होईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. तसेच अमूक व्यक्ती एखाद्या पक्षात असली म्हणजे त्या व्यक्तीला काहीही करायचा परवाना मिळत नाही, असंही सामंत यांनी म्हटलंय.
हेही वाचा – शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?
आरोपांनी शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे
हा निर्घृणतेचा कळस आहे. हा अमानुषपणा आहे. मी राजकीय पुढारी आहे, मी नेता आहे, मी कुठल्यातरी पक्षात काम करतोय म्हणून मला अशी कुकृत्ये करण्याची मुभा आहे, असं चित्र भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी वैष्णवी हगवणेच्या आत्महत्याप्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. आरोपांनी शिक्षेपर्यंत नेलं पाहिजे, असं मतही उदय सामंत यांनी व्यक्त केलं.
पुढच्या काही 24 तासांत…
अशी प्रवृत्ती ठेचली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. या प्रकरणात ज्या दोन व्यक्ती फरार आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी सहा पथकं तयार करण्यात आली आहेत. पुढच्या काही 24 तासांत त्यांना तुरुंगात टाकण्यात पोलीस यशस्वी होतील. त्यांनी जो नीचपणा केला आहे, तो पहता त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असंही मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.