महाराष्ट्रात पुन्हा भूकंपाचे धक्के? गूढ आवाजाने नागरिकांमध्ये भीती

Earthquake News : जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात दुपारी अचानक जमीन थरथरल्याचा अनुभव नागरिकांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास भूकंपासारखे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. धक्क्यांसोबतच जमिनीतून गूढ आवाज ऐकू आल्याचा दावा स्थानिकांनी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अचानक झालेल्या या प्रकारामुळे अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी गर्दी केली. जमीन हलल्याचा अनुभव आणि गूढ आवाज यामुळे अनेकजण घाबरल्याचे दिसून आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या वृत्तानंतर प्रशासन सतर्क झाले असून संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन
दरम्यान, या घटनेबाबत अद्याप अधिकृत यंत्रणांकडून भूकंप झाल्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
स्थानिकांच्या मते, गेल्या काही काळात हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे किरकोळ धक्के जाणवण्याच्या घटना अधूनमधून घडत आहेत. त्यामुळे पांगरा शिंदे परिसरातील आजच्या घटनेने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




