‘प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत यायचं असेल, तर..’; काँग्रेस नेत्याचं विधान
मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होण्याचं निमंत्रण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आलं आहे. मात्र, वंचितला इंडिया आघाडीमध्ये समावेशाबाबत आधी निर्णय घ्या, त्यानंतरच यात्रेत सहभागी होता येईल, अशी भूमिका प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे. यावरून काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
इंडिया आघाडीत २८ पक्ष आहेत. प्रकाश आंबेडकरांना ‘इंडिया’ आघाडीत यायचं असेल, तर मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घ्यावी. प्रकाश आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत, याची माहिती नाही. मल्लिकार्जुन खर्गेंना भेटण्यास प्रकाश आंबेडकरांना काय अडचण आहे? असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
हेही वाचा – Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची मूर्ती विराजमान
महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत चर्चा चालू झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर नेते, मतदारांचं आकलन करण्यास वेळ लागत आहे. अशी परिस्थिती इतर कुठेही झाली नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
भाजपाचा आत्मविश्वास ढळला आहे. भाजपाचं २०१४ मध्ये आर्थिक आणि २०१९ साली राष्ट्रीय धोरण फसलं आहे. आता प्रभू श्री राम मंदिराचा विषय भाजपानं समोर आणला आहे. पण, भाजपाला यश मिळत नाही. म्हणून ईडी आणि आर्थिक आमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत. तरीही, भाजपाला जिंकण्याचा आत्मविश्वास नाही. ही लोकसभा निवडणूक सोप्पी नसल्याचं भाजपाला कळून चुकलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.