राज्याला मिळाले 16 नवे आमदार; महायुतीची ताकद आणखी वाढली

Maharashtra Politics : राज्य विधानपरिषदेत आज नवनिर्वाचित 16 सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून आलेल्या सदस्यांसह यापूर्वी निवडून आलेल्या काही सदस्यांनीही आज आमदारपदाची शपथ घेतली. यामुळे विधानपरिषदेतील महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.
22 जून रोजी जाहीर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालात 11 पैकी 10 जागांवर महायुतीने विजय मिळवत दमदार कामगिरी केली होती. नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला असला, तरी विजयी उमेदवार गोकुळ गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यामुळे तेही महायुतीच्या गटात सहभागी झाले आहेत.
आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात पुण्याचे विक्रम काकडे, रत्नागिरीचे अनिकेत तटकरे, साताऱ्याचे धैर्यशील कदम, सोलापूरचे राजेंद्र राऊत, अहमदनगरचे प्राजक्त तनपुरे यांच्यासह एकूण 16 सदस्यांनी शपथ घेतली. खासदार सुप्रिया सुळे यांचे जावई अरुण लखाणी यांनीही आमदारपदाची शपथ घेतली. यावेळी रेवती सुळेही विधिमंडळात उपस्थित होत्या.
गेल्या दोन महिन्यांत विधानपरिषदेच्या एकूण 27 जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यापैकी महायुतीने 25 जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केले आहे. शपथविधीनंतर काही सदस्यांनी घोषणाबाजीही केली. अमर राजूरकर यांनी “जय श्रीराम, जय भाजपा” अशी घोषणा दिली, तर राजेंद्र राऊत यांनी “जय शिवराय”चा जयघोष केला.
हेही वाचा – दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला; आज उर्वरित राज्यात मान्सूनचा प्रवेश
शपथ घेतलेले 16 सदस्य
विक्रम काकडे
अनिकेत तटकरे
धैर्यशील कदम
गोकुळ गीते
राजीव पोतदार
बसवराज पाटील
अरुण लखाणी
अमर राजूरकर
अविनाश ब्राह्मणकर
दुष्यंत चतुर्वेदी
नंदकिशोर महाजन
प्रवीण पोटे
सुहास शिरसाठ
रवींद्र फाटक
राजेंद्र राऊत
प्राजक्त तनपुरे
विधानपरिषदेतील या नव्या सदस्यांच्या आगमनाने राज्याच्या राजकारणात महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.





