दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू, पहलगामच्या दोषींना सोडणार नाही : अमित शाह
काश्मीरमध्ये ९० च्या दशकापासून दहशतवाद सुरू

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करून 26 जणांचा जीव घेणाऱ्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदाच मोठी प्रतिक्रिया दिली. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी दहशतावाद्यांवर जोरदार हल्लाबोल केला. ” पंतप्रधान मोदी सरकारच्या काळात प्रत्येत दहशतवादी कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले. दहशतवाद्यांना वेचून-वेचून मारू , पहलगामच्या दोषींना सोडणार नाही, सूड घेतला जाईल . दहशतवाद्यांच्या आकांनाही आता सोडणार नाही ” असा सज्जड इशारा अमित शाह यांनी दिला. दहशतवादाविरुद्ध आमचे शून्य सहनशीलतेचे (Zero Tolarance) धोरण आहे असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
शाह म्हणाले की, “काश्मीरमध्ये ९० च्या दशकापासून दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण सुरूच आहे. आपल्या 26 लोकांना मारून ते त्यांचे ध्येय साध्य करतील असं त्यांनी समजू नये. एखादी भ्याड कृती करून आपला विजय झाला, असं जर कोणी समजत असेल तर मी हे ठामपणे सांगू इच्छितो की कोणालाच सोडणार नाही, एकालाही सोडणार नाही. देशातील प्रत्येक इंचा-इंचातून आम्ही दहशतवाद मुळापासून उखडून फेकू, दहशतवाद संपवू ” असा इशारा अमित शाह यांनी दिला.
हेही वाचा – तुळजापूर ड्रग्सवरुन जुंपली, ओमराजे निंबाळकर अन् राणा पाटलांमध्ये पालकमंत्र्यांसमोरच खडाजंगी
हा लढाईचा अंत नाही, चुन-चुन के जवाब देंगे – अमित शहांचा निर्धार
हा लढाईचा अंत नाही, सुरूवात आहे, असे ते पुढे म्हणाले. दहशतवाद पसरवणाऱ्या सर्वांना मी सांगू इच्छितो की त्यांना वेचून-वेचून शोधून काढू आणि उत्त देऊ. कोणालाही सोडले जाणार नाही. जोपर्यंत दहशतवादाचे समूळ उच्चाटन होत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील. ज्यांनी हे कृत्य (दहशतवादी हल्ला) केला त्यांना याची शिक्षा मिळणारच”,असा थेट इशारा अमित शाह यांनी पुन्हा दिला.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे भयानक दहशतवादी हल्ला झाला, त्याता 26 जणांचा मृत्यू झाला होता.त्यामध्ये 25 पर्यटक आणि 1 स्थानिक नागरीक होता. मृतांमध्य परदेशी नागरिकाचाही समावेश होता. देशभरातून काश्मीरचे सौंदर्य पाहण्यासाठी , फिरण्यासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले आणि त्यांची कुटुंबियांसमोरच क्रूरपणे हत्या केली. या हल्ल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी अमित शाह श्रीनगरला रवाना झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत विचारपूसही केली.