ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

सोलापूरचे डॉ. राजीव प्रधान यांच्याकडून काश्मिरींवर उपचार

जम्मू कश्मिरचे ले. गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे मोहिमेसाठी पाठबळ

सोलापूर : पहलगाममध्ये अतिरेकी गोळीबार करून लोकांचा जीव घेताना तेथून केवळ एका तलावाच्या पलीकडील किश्तवाड येथे डॉक्टर गरजू रुग्णांच्या शस्त्रक्रिया करून लोकांचे प्राण वाचवत होते. चार वर्षांपासून सुरू असलेल्या या शस्त्रक्रिया शिबिराचे नायक सोलापुरातील डॉ. राजीव प्रधान हे आहेत. यापूर्वीही एकदा त्यांच्या जवळच्याच भागात अतिरेकी हल्ला झाल्याची आठवण त्यांनी सांगितली.

येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. राजीव प्रधान यांनी यापूर्वी तब्‍बल २५ वर्षे आफ्रिका खंडात मोफत शस्त्रक्रिया मोहिमेत सहभाग नोंदवला. चार वर्षापासून त्यांनी जम्मू व कश्मिरातील दुर्गम भागात रोटरी क्लबच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया मिशन हाती घेतले. दरवर्षी राज्य व देशातील निवडक डॉक्टरांची टीम या मिशनमध्ये सहभागी होते.

यावर्षी ही मोहीम १६ ते २४ एप्रिल या कालावधीत होती. जम्मू कश्मिरचे ले. गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या मोहिमेसाठी पाठबळ दिले होते. डॉक्टरांची पथके पहलगामपासून जवळच असलेल्या किश्तवाड व डोडा येथे पोहोचली होती. या मोहिमेचे समन्वयक डॉ. राजीव प्रधान हे बदरवाह येथून समन्वय करत होते. पहेलगाम व किश्तवाड या दोन्हीमध्ये एक तलाव व जंगल देखील आहे. अतिरेक्यांनी हल्ला केला तेव्हा ते किश्तवाडमध्ये डॉक्टरांच्या टीमसोबत शस्त्रक्रिया मोहिमेत होते. यामध्ये महिलांच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया, गॉल ब्लॅडर स्टोन, मोतिबिंदू शस्त्रक्रिया आदी सुरू होत्या.

हेही वाचा –  तुळजापूर ड्रग्सवरुन जुंपली, ओमराजे निंबाळकर अन् राणा पाटलांमध्ये पालकमंत्र्यांसमोरच खडाजंगी

६० डॉक्टरांचा सहभाग
रोटरी क्लबच्या वतीने हा शिबिराचा उपक्रम चालवला जातो. एकूण ६० डॉक्टर्स देशभरातून त्यात सहभागी होतात. ते स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत शिबिर घेतात. काश्मिर राज्याच्या चारही बाजूंना दुर्गम भागात हे शिबिर घेतले जाते. जेणेकरून अत्यंत गरजू लोकांपर्यत ही सेवा पोहचू शकेल. जम्मू काश्मिर राज्य शासनाने आतापर्यंत या शिबिरात चार वर्षांत दहा हजार शस्त्रक्रिया पार पडल्याचे जाहीर केले आहे. तेथील सर्वसामान्य नागरिक अत्यंत गरीब आहे व त्याला या दहशतवादाशी देणेघेणे नाही. शस्त्रक्रिया झाल्यानंतर आवर्जून सफरचंद व इतर भेटवस्तू डॉक्टरांना ते प्रेमाने देतात.

तुम्ही त्यांना आश्रय देऊ नका
या शस्त्रक्रिया मोहिमेच्या उद्‌घाटनप्रसंगी ले. गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सांगितले की, राज्यात रस्ते, शिक्षण, शासकीय योजना आदींच्या माध्यमातून विकास गतिमान होत आहे. मात्र तुम्ही प्रलोभन किंवा दहशतीला बळी पडून अतिरेक्यांना आश्रय देऊ नये असे जाहीरपणे सांगितले. त्यांचे हे वक्तव्य स्थानिक माध्यमात गाजले होते.

डॉक्टरांच्या निवासस्थानाजवळ बंदोबस्त
किश्तवाडच्या जंगलात अतिरेकी लपले असावेत असा संशय होता. त्यामुळे तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व डॉक्टरांना त्याची सूचना दिली. डॉक्टरांच्या निवासस्थानी पहारा वाढवण्यात आला. त्याही स्थितीत डॉक्टरांनी मोहीम पूर्ण करत तब्बल ७०० शस्त्रक्रिया केल्या. नंतर ते २४ एप्रिलला कश्मिरमधून परतले. यापूर्वी देखील बारामुल्ला येथे अतिरेक्यांनी बॉम्ब टाकला असताना त्याच शहरात ते शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button