‘अहमदाबादचं नामांतर सावरकरनगर करून दाखवा’; सुषमा अंधारेंचं भाजपाला आव्हान
जनतेच्या जीवशी खेळ करण्याचा प्रयत्न भाजपानं सुरू केला आहे

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली आहे. यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला चांगलंच सुनावलं आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, ही सावरकर गौरव यात्रा नाही तर अदानी बचाव यात्रा आहे. गौतम अदानींवरून लोक प्रश्न विचारतील याची भिती वाटते म्हणून त्यांनी ही सावरकर गौरव यात्रा काढली आहे. भाजपाच्या लोकांमध्ये खरंच सावरकरांबद्दल प्रेम असेल तर नाशिकमधलं भगूर हे त्यांचं जन्मस्थळ आहे, त्याची दुरवस्था का झाली आहे? तिथे भाजपाने काय असे मोठे दिवे लावले आहेत. का तिथे मोठं स्मारक उभारलं नाही? , असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
भाजपचे जर खरंच सावरकरांवर प्रेम असेल तर सर्वात आधी अहमदाबादचं नामांतर सावरकरनगर करून दाखवावं, असं आव्हान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाला केलं आहे.
संभाजीनगरमध्ये भाजपानं ठरवून महाविकास आघाडीच्या सभेत विघ्न आणण्यासाठी अक्षरश: संभाजीनगरमधील जनतेला वेठीस धरलं आहे. जनतेच्या जीवशी खेळ करण्याचा प्रयत्न भाजपानं जाणीवपूर्वक सुरू केला आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.





