काँग्रेसच्या काळात ४८,२०,६९,००,००,००० रूपयांचा घोटाळा; भाजपचा धक्कादायक आरोप
मनमोहन सिंग यांनी या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली

Congress Files : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदाणी समूह प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षाने संसदेत गोंधळ घालत अदाणी समूहाची संयुक्त संसदीय चौकशीची मागणी केली आहे. अशातच आता भाजपने काँग्रेस पक्षावर ४८,२०,६९,००,००,००० रूपयांचा आरोप केला आहे.
भाजपाच्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. काँग्रेसच्या काळात एकामागे-एक कसे घोटाळे झालेत पाहा, असं त्यावर लिहलं आहे. तसेच व्हिडीओत काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार असंही लिहलं आहे. काँग्रेसने आपल्या ७० वर्षांच्या काळात जनतेचे ४८,२०,६९,००,००,००० रूपये लुटले आहेत. या पैशांचा वापर जनतेच्या विकासासाठी केला जाऊ शकत होता, असंही भाजपने म्हटलं आहे.
या पैशांत २४ आयएनएस विक्रांत, ३०० राफेल जेट आणि १ हजार वेळा मिशन मंगल यान मोहिम राबवता आली असती. पण काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचाराची किंमत देशाला भोगावी लागत आहे. त्यामुळे देश प्रगतीच्या बाबतीत मागे राहिला आहे, असं व्हिडीओत म्हटलं आहे.
मनमोहन सिंग यांनी या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक केली. त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार होत राहिला. भ्रष्टाचारांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची पान भरली जात होती. हे पाहू भारतीयांनी मान लाजून खाली जात असे, असं भाजपाने व्हिडीओत म्हटलं आहे.
१.६८ लाख कोटी रूपयांचा कोळसा घोटाळा, १.७६ लाख कोटींचा २ जी स्पेक्ट्रम घोटाळा, १० लाख कोटी रूपयांचा कॉमनवेल्थ घोटाळा, इटलीबरोबर झालेल्या हेलिकॉप्टर व्यवहारात ३६२ कोटी रूपयांची लाच देण्यात आली, असा धक्कादायक आरोप भाजपाने काँग्रेसवर केला आहे. हा फक्त काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा ट्रेलर आहे. चित्रपट अजून संपलेला नाही, असा इशाराही भाजपाने काँग्रेसला दिला आहे.





