‘अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिली’; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा बुधवारी (१६ एप्रिल) नाशिक येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील खास AI तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या भाषणाने सर्वांचे लक्ष वेधले. या भाषणात आजच्या राजकीय परिस्थितीवर बाळासाहेबांच्या शैलीत भाष्य करण्यात आले. मात्र, यावर शिवसेना (शिंदे गट) नेत्यांनी टीका केली, ज्याला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिल्याचा दावाही केला.
खासदार संजय राऊत म्हणाले, की एक बनावट शिवसेना अमित शाह यांनी सुरु केली आणि महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका बनावट वाटणारच. हे काय काल झालं का? मुंबईत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणाचा अशा प्रकारचा प्रयोग केला याआधीही केला होता. तेव्हा त्यांचं लक्ष गेलं नाही का? अमित शाह यांनी बनावट संघटना तयार केली आणि त्या संघटनेला शिवसेना नाव द्यायला लावलं, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर त्यांचा अधिकार होत नाही. त्यांनी धर्मवीर चित्रपट काढला, मग आनंद दिघे यांच्याबाबत त्यामध्ये बनावट संवाद तुम्ही निर्माण केले, ते तुम्हाला चालले का? असा सवाल राऊतांनी केला.
हेही वाचा : ‘आम्ही फक्त पायलट-को-पायलट बदललो’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘खुर्ची’ वरून टोला
अमित शाह हे शिंदेंच्या पक्षाचे प्रमुख आहेत. आम्ही जर अमित शाह यांच्यावर काही बोललो तर मग शिंदे गटाची तक्रार करणं योग्य आहे. आम्ही शिवसेना प्रमुखांबाबत बोललो तर त्यात शिंदेंच्या शिवसेनेचा काय संबंध? असं संजय राऊत म्हणाले.
अमित शाह यांनी शिंदे गटाला तंबी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांची चाकरी करा किंवा सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे की त्यांच्यात काय चर्चा होतात. त्यांनी देखील त्यांच्या नेत्यांना सांगितलं की आपण येथेच राहू, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याबाबत काही शिकवू नये, असंही संजय राऊत म्हणाले.