‘ज्या लोकांना रंगांचा त्रास होत असेल त्यांनी देश सोडून जावं’; मंत्र्याचं वक्तव्य

Sanjay Nishad | ज्या लोकांना होळीच्या रंगांचा त्रास होत असेल त्यांनी हा देश सोडून इथून निघून जावं. मुळात मुस्लीम समुदाय देखील रंगांपासून दूर नाही. त्यंच्याही घरात व आयुष्यात विविध रंग आहेत. ते देखील त्यांची घरं रंगवतात. पण काही लोक रंगांमध्ये विष कालवून समाजात अस्थिरता निर्माण करू पाहतायत, असं वक्तव्य उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री आणि निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय निषाद यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
संजय निषाद म्हणाले, की आमचा पक्ष निषाद समुदायाला एकत्र ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आमचा पक्ष भाजपाबरोबर युतीत असला तरी आम्ही आमची ओळख कायम ठेवली आहे. आम्ही निषाद समुदायाच्या हितासाठी काम करत राहू. तसेच निषाद समुदायाचं समर्थन करणारी भारतीय जनता पार्टी मजबूत व्हावी यासाठी देखील आम्ही काम करत आहोत. समुदाय आमच्या बाजूने आहे. समाजात अस्थिरता पसरवणाऱ्या कोणत्याही रणनितीला आमचा समुदाय व उत्तर प्रदेशमधील जनता बळी पडणार नाही.
हेही वाचा : ..तर महाकुंभातील गढूळ पाण्यात लोकांना अंघोळ का करायला लावली? संजय राऊतांचा सवाल
होळी व जुम्मा एका दिवशी आल्याने काहीजण यावरून वाद निर्माण करू पाहतायत. त्यांना माझा संदेश आहे की होळीच्या दिवशी आपण रंग उधळतो, एकमेकांना रंग लावतो आणि आनंद साजरा करतो. कोणीही या रंगात विष कालवण्याचा प्रयत्न करू नये, असं संजय निषाद म्हणाले.
होळीमुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारते. त्यामुळे आपोआप सर्वांच्या घरी सुख व शांतीचं आगमन होतं. भारतीय संस्कारांनुसार सण हे आनंद साजरा करण्यासाठी असतात. सणांच्या निमत्ताने लोक आपसातील कटुता दूर करण्यासाठी पुढाकार घेतात, एकमेकांची गळाभेट घेतात. त्यामुळे ज्याला कोणाला रंगांची अडचण असेल त्यांनी केवळ त्यांचं घर नव्हे, तर हा देश सोडून निघून जावं, असंही संजय निषाद म्हणाले.