पृथ्वीराज चव्हाण यांचं विरोधी पक्षनेते पदावरून मोठं भाष्य; म्हणाले..

Prithviraj Chavan | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महाराष्ट्रात महायुतीला २३९ जागांचं रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. तर, महाविकास आघाडीने केवळ ५० जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत शिवसेना (ठाकरे) २०, काँग्रेस १६ तर राष्ट्रवादी (शरद पवार) १० आमदार निवडून आले आहेत. विरोधी पक्षनेतेपदासाठी २९ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सकाळी शरद पवार यांची कराड येथे भेट घेतली. या भेटीबाबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आमच्या भेटीत राजकीय चर्चा झाली. उद्याची रणनीती तत्काळ ठरवता येणार नाही. आमच्या नेतृत्त्वाला विनंती केली आहे की दोन दिवसांत काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक घ्या. तळागाळात काय मतं हे जाणून घेण्याची विनंती केली.
हेही वाचा – ‘नवं सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषण करणार’; मनोज जरांगेची घोषणा
विधानसभेत आम्हाला विरोधी पक्ष नेते पद मिळणार नाही. त्यामुळे विधिमंडळात फार मोठी लढाई होणार नाही. लोकांचे प्रश्न बाहेरच मांडायचा प्रश्न करू. पत्रकार परिषद आणि बैठका घेण्याचं काम सुरू राहणार, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असतो. लोकसभेत यूपीएकडे आवश्यक संख्याबळ असतानाही कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने काँग्रेसला २०१४ आणि २०१९ मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आले होते. हेच सूत्र भाजपकडून विधानसभेत कायम ठेवले जाईल, अशी चिन्हे आहेत.





