“२ तारखेला कमळाचं बटन दाबा”; भरसभेतून एकनाथ खडसेंचे आवाहन, नंतर चूक लक्षात आली अन्…नेमकं काय घडलं?

Eknath Khadse : महायुतीच्या नेत्यांनी राज्यातील स्थानिक निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. राज्यात सत्तेत असलेली महायुती या निवडणुकांमध्ये विखुरलेली आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वंतत्र निवडणुका लढवत आहेत. विचित्र आघाड्या आणि युत्या निवडणुकीत केल्या जात आहेत. पण महाविकास आघाडीचे नेते कुठे दिसत नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रंगत वाढताना बघायला मिळत आहे. अलीकडेच मुक्ताईनगर नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार ‘सक्षम नाही’ असा उल्लेख केला केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.
याशिवाय जळगावच्या स्थानिक राजकारणात खडसे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना अप्रत्यक्ष फायदा मिळवून दिल्याची केली जात होती. आता भुसावळमधील निवडणुकीच्या प्राचारार्थ आयोजित सभेतून एकनाथ खडसे यांनी केलेल्या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, खडसेंना कार्यकर्त्यांनी झालेली चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी जे चुकीचे विधान केले त्यावर स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा – दित्वा चक्रीवादळाचा राज्यात कुठे अन् काय परिणाम? श्रीलंकेत आणीबाणी
“भाजपला मतदान करा”, असे थेट आवाहनच खडसेंनी जाहीर सभेतेून केले. त्यानंतर क्षणभर गोंधळ उडाला होता. अखेर कार्यकर्त्यांनी आठवण करून दिल्यानंतर खडसे यांनी चूक दुरुस्त करत “तुतारीलाच मतदान करा” असं सांगितले. यामुळे गेल्या अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीत काम केल्याने एकनाथ खडसे यांनी सभेतून केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या मनात अजून भाजपा गेली नसल्याची चर्चा केली जात आहे.
नेमकं काय होते एकनाथ खडसे?
“येणाऱ्या २ तारखेच्या मतदानाच्या दिवशी प्रत्येक मत कमळाच्या फुलावर असले पाहिजे” असे एकनाथ खडसे म्हणाले होते. चुक लक्षात आल्यानंतर त्यांनी दुरुस्ती करत तुतारीला मतदान करा, असे आवाहन उपस्थितांना केले. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, चर्चांना उधाण प्राप्त झाले आहे.




