कोणाचीही खैर नाही! राज्यातील गंभीर प्रकरणांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आढावा; पोलिसांना दिले हे कडक निर्देश

Devendra Fadnavis : नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरण, मल्टीनॅशनल कंपनीतील कथित धर्मांतर, परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि मुंबईतील गोरेगाव नेस्को ड्रग्ज या सर्व प्रकरणांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाच्या आढावा बैठकीत कडक भूमिका घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवत त्यांनी पोलिस यंत्रणेला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
या बैठकीसाठी पोलीस महासंचालक, गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी, एसआयटी प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संबंधित सर्व प्रकरणांमध्ये तपासाची दिशा योग्य राहावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यावर मुख्यमंत्र्यांनी विशेष भर दिला.
नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात पीडितांना विश्वास देण्यासोबतच दोषींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी दिले. “कोर्टात केस मजबूत राहावी आणि अपराध सिद्ध होण्यासाठी पुराव्यांची साखळी पक्की असावी,” असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिला.
हेही वाचा – IPLमध्ये RCBच्या तिकीटांचा काळाबाजार; कँटीन कर्मचाऱ्याला अटक, एका तिकीटाची किंमत किती?
तसेच, नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतराच्या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत “असे प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकरणा प्रत्येक अँगलने तपास करण्याचे निर्देश देत कोणताही तपशील सुटू नये, यावर त्यांनी भर दिला.
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा प्रकरणात पीडितांना समुपदेशनाद्वारे तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा सल्ला देत समाजसेवकांची मदत घेण्याचे निर्देश फडणवीसांनी दिले. तर मुंबईतील गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठ्या प्रमाणावर कारवाई करत ड्रग्जविरोधात कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले.
“तरुणांच्या भविष्याशी संबंधित या प्रकरणांकडे अत्यंत गंभीरतेने पाहणे आवश्यक आहे,” असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारीविरोधात शून्य सहनशीलतेची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.





