‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा’; शिवसेनेच्या नेत्याची मागणी

मुंबई | विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. महाराष्ट्र विधानसभेत सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. मात्र महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत. भाजपा १३२, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांची राष्ट्रवादी ४१ अशा जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यातच, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा आणि एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे.
नरेश मस्के म्हणाले, की एकनाथ शिंदे यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर करतील असा आम्हाला (शिवसेना) विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली जाईल अशी आम्हाला खात्री आहे. कारण आत्ता जे प्रचंड यश मिळालं आहे ते यश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवलेल्या निवडणुकांमध्ये मिळालं आहे. मी माझ्या पक्षाचा साधा कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणून माझी ही भावना आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार? भाजपा नेत्याचा दुजोरा
बिहारमध्ये ज्या प्रमाणे नितीश कुमार यांच्या कमी जागा येऊनही त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली गेली. महाराष्ट्रतही बिहार पॅटर्न राबवून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे. हरियाणातही सैनी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. ज्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली जाते त्यांनाच मुख्यमंत्री केलं जातं हा पॅटर्न एनडीएने राबवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातही तसंच होईल असं आम्हाला वाटतं. शेवटी महायुतीचे सगळे नेते योग्य तो निर्णय करतील. मात्र जे.पी. नड्डा, अमित शाह, नरेंद्र मोदी हे एकनाथ शिंदेंचं नाव जाहीर करतील, असंही नरेश म्हस्के म्हणाले.





