मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुत्रासह अमित शाहांच्या भेटीला; भेटीचं नेमकं कारण काय?

नवी दिल्ली : राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी अमित शाह यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेतलीय. या भेटीत अहिल्यानगरच्या लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरणासाठी अमित शाह यांना निमंत्रित करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सोबतच, नवीन गाळप हंगाम सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एन.सी.डी.सी. लोनमुळे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर या कारखान्याचे नूतनीकरण करण्यात यावं, अशी मागणीही यावेळी करण्यात आल्याचे सांगितलं जातंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रमुख उपस्थिती लाभावी अशी विनंतीही यावेळी विखे पिता पुत्राने केली आहे. शिवाय अमित शाह यांनी देखील दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबद्दल सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले अहिल्यानगर येथील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी वेळोवेळी आपल्या पुनर्वसनाची मागणी केली आहे. नुकतेच नगर शहरात भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नवंनिर्वाचित आमदारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. या सत्कार समारंभासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह महायुतीच्या दहा पैकी आठ आमदारांनी हजेरी लावली. या सत्कारसमारंभामध्ये माजी खासदार सुजय विखे यांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. त्यामुळे आता सुजय विखे पाटलांची केंद्रात वर्णी लागणार का? आणि त्या अनुषंगानेचं ही भेट होती का? अशा चर्चा रंगू लागल्या आहे.
हेही वाचा – पहलगाम हल्ल्यानंतर उमर अब्दुल्लांची पीएम मोदींशी पहिली भेट: काय झाली चर्चा?
देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल (3 मे) पनवेल स्थानकावर सुरू असलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामाची सविस्तर तपासणी आणि आढावा घेतला. त्यांच्या भेटीदरम्यान, पनवेल स्थानकाला लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल स्टेशन म्हणून विकसित केले जाईल, अशी घोषणा मंत्र्यांनी केली, जे मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधांच्या धोरणात्मक वाढीच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे.
पनवेल यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प सध्या स्टेशनची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारण्यासाठी सुरू आहे. या प्रकल्पात नवीन मार्गांचे बांधकाम आणि विद्यमान यार्ड लेआउटचे व्यापक पुनर्गठन समाविष्ट आहे, जेणेकरून सुधारित ट्रेन हाताळणीला समर्थन मिळेल आणि समर्पित फ्रेट कॉरिडॉर (DFC) सह अखंड एकात्मता सुलभ होईल.
लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून पनवेलचा विकास विद्यमान मुंबई टर्मिनल्सवरील गर्दी कमी करण्यासाठी आणि वाढत्या पनवेल प्रदेशातील प्रवाशांना अधिक कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी सज्ज आहे. हा उपक्रम, क्षमता व कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि संपूर्ण नेटवर्कमधील प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.