Former Army Chief Naravane | आत्मचरित्रावरील वादावर माजी लष्करप्रमुख नरवणे यांनी सोडले मौन, म्हणाले, “पुस्तकाची सध्याची…”
Former Army Chief Naravane | 'पेंग्विन'नेजारी केलेले स्पष्टीकरण सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत मांडली आपली भूमिका
नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) या अद्याप प्रकाशित न झालेल्या आत्मचरित्रावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर जनरल नरवणे यांनी आज अखेर आपले मौन सोडले. त्यांनी ‘पेंग्विन’ प्रकाशक संस्थेने जारी केलेले स्पष्टीकरण सोशल मीडियावर पुन्हा शेअर करत आपली भूमिका मांडली.
“पुस्तकाची सध्याची स्थिती ही आहे,” असे लिहित नरवणे यांनी ‘पेंग्विन’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाचा स्क्रीनशॉट ‘X’ वर शेअर केला.
‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’चे स्पष्टीकरण
‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’ने सोमवारी एक प्रसिद्धीपत्रक जारी करून स्पष्ट केले की, जनरल नरवणे यांच्या आत्मचरित्राचे सर्व प्रकाशन हक्क त्यांच्याकडेच आहेत. हे पुस्तक अद्याप कोणत्याही स्वरूपात प्रकाशित झालेले नाही. या पुस्तकाच्या हस्तलिखिताच्या अनधिकृत प्रती चलनात असल्याच्या वृत्तामुळे हा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा (FIR) दाखल केला असून अनधिकृतपणे मजकूर वितरित केल्याच्या संशयावरून तपास सुरू केला आहे.

… तो कॉपीराइट कायद्याचा भंग ठरेल
पेंग्विन प्रकाशन संस्थेने स्पष्ट केले आहे की, ” जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकाचे एकमेव प्रकाशन हक्क आमच्याकडे आहेत. हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही. छापील किंवा डिजिटल अशा कोणत्याही स्वरूपात हे पुस्तक विक्रीसाठी किंवा लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले नाही.”तसेच, कोणत्याही व्यासपीठावर या पुस्तकाची प्रत फिरत असल्यास तो कॉपीराइट कायद्याचा भंग ठरेल आणि ते तातडीने थांबवण्यात यावे, असा इशाराही प्रकाशकांनी दिला आहे.
राहुल गांधींनी दिला होता नरवणे यांच्या आत्मचरित्राचा संदर्भ
गेल्या आठवड्यात संसदेच्या आवारात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या पुस्तकाची एक प्रत दाखवल्याने या वादाला तोंड फुटले होते. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २ फेब्रुवारीपासून लोकसभेत या पुस्तकातील उतारे उद्धृत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पुस्तक अधिकृतपणे प्रकाशित झाले नसल्याचे कारण देत त्यांना रोखण्यात आले. यानंतर संसदेबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते की, “लोकसभा अध्यक्ष म्हणतात की, हे पुस्तक अस्तित्वात नाही, सरकार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील तेच म्हणतात. पण भारतातील प्रत्येक तरुणाने हे पाहिले पाहिजे की हे पुस्तक अस्तित्वात आहे.” २०२० मध्ये लडाखमध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या संघर्षाचा संपूर्ण वृत्तांत माजी लष्करप्रमुखांनी या पुस्तकात लिहिला असल्याचेही गांधी यांनी यावेळी नमूद केले.




