पंतप्रधानांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बाईकने प्रवास

मुंबई | पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आज थेट दुचाकीवरून प्रवास करत विधानभवन गाठले. मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे राजकीय वर्तुळात आणि जनतेमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील कच्च्या तेलाचा व्यापार विस्कळीत झाला आहे. याचा फटका भारताच्या इंधन पुरवठ्याला बसू नये, यासाठी केंद्र सरकार अधिक सावध झाले आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्म्यावर आणून आदर्श घालून दिला आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये RMC प्लॅट्स नियमावलीसाठी जनसुनावणी घ्या!
सुरक्षा ताफ्यात कपात आणि दौऱ्यांवर निर्बंध
महाराष्ट्र सरकारने केवळ मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्याच कमी केली नाही, तर मंत्री आणि सनदी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यांवरही निर्बंध आणले आहेत. प्रशासकीय खर्चात कपात आणि इंधन बचतीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री फडणवीस आणि आशिष शेलार जेव्हा दुचाकीवरून विधानभवनात आले, तेव्हा त्यांचे सुरक्षा रक्षकही त्यांच्या मागे दुचाकीवरूनच प्रवास करताना दिसले.





