“एक दिवस हे सगळं संपणार आहे…” विक्रमी शतकानंतर विराट कोहलीचं भावुक वक्तव्य

Virat Kohli | आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) खेळताना ‘किंग कोहली’ने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत ऐतिहासिक शतक झळकावले. अवघ्या ५८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने विराटने शतकी पल्ला गाठला. या खेळीदरम्यान त्याने अनेक जागतिक विक्रमांना गवसणी घातली, मात्र सामन्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत विराटने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
या शतकी खेळीसह विराट कोहलीने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात १४,००० धावांचा टप्पा ओलांडला. टी-२० मध्ये सर्वात कमी डावांत इतक्या धावा करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. तसेच, भारतासाठी टी-२० मध्ये १४ हजार धावा करणारा आणि सर्वाधिक १० शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्येही सर्वाधिक शतकांचा विक्रम आता कोहलीच्या नावे अधिक भक्कम झाला आहे.
हेही वाचा
साखर निर्यातीवर सप्टेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
आपल्या फलंदाजीबद्दल बोलताना विराट म्हणाला, “मला आज सर्वाधिक आनंद माझ्या क्रीजवरील स्थिरतेचा झाला. मी कोणताही अतरंगी फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, तर केवळ नैसर्गिक खेळावर लक्ष केंद्रित केले. योग्य चेंडूची निवड करून गॅप्स शोधणे आणि गरजेनुसार धावून दुहेरी धावा घेण्यावर मी भर दिला. स्वतःच्या मूलभूत तंत्रावर विश्वास ठेवून ते अंमलात आणता आले, याचा मला मोठा आनंद आहे.”
“एक दिवस हे संपणार आहे…”
जेव्हा त्याला विक्रमांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा विराटने अतिशय मनाला भिडणारे उत्तर दिले. तो म्हणाला, “मला फलंदाजी करायला प्रचंड आवडते. या स्तरावर जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. मी आयुष्यभर फक्त क्रिकेटच खेळलो आणि या खेळावर मनापासून प्रेम केलंय. मी मैदानावर असताना माझं संपूर्ण मन आणि आत्मा झोकून देतो, कारण मला माहित आहे की एक दिवस हे सगळं संपणार आहे.”
तो पुढे म्हणाला की, “जोपर्यंत खेळतोय, तोपर्यंत मैदानावरचा प्रत्येक क्षण जगायचा आहे. मला दडपणाच्या परिस्थिती आवडतात. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा तुम्ही अधिक चांगले माणूस बनता. इतके विक्रम आणि आकडे असूनही, माझ्यासाठी अजूनही बॅटच्या मधोमध चेंडू लागण्याचा आनंद तसाच आहे. हे सगळं देवाच्या कृपेने शक्य झालंय आणि मी त्यासाठी कृतज्ञ आहे.”





