‘पैशांचा विषय येताच दोन्ही देश थांबले’; भारत-पाक संघर्षावर ट्रम्प यांचे विधान

Donald Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२५ साली पहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. ‘बोर्ड ऑफ पिस’ या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत, व्यापाराच्या माध्यमातून संघर्ष थांबविण्यात आपली महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. मात्र भारताने ट्रम्प यांचा हा दावा यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
बोर्ड ऑफ पिस कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प म्हणाले, दोन अण्वस्त्रधारी देशांमध्ये युद्ध भडकले होते. मग मी दोन्ही देशांच्या प्रमुखांना फोन लावला. कारण माझे दोघांशीही चांगले संबंध आहेत. मी पंतप्रधान मोदींना चांगले ओळखतो. मी दोन्ही देशांना सांगितले की, तुम्ही युद्ध करणार असाल तर मी तुमच्याशी व्यापार करणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे तात्काळ थांबवावे लागेल.
हेही वाचा : शिवनेरी प्रेरणेची तर आग्र्याचा लाल किल्ला ही स्वाभिमानाची भूमी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जर तुम्ही युद्ध करणार असाल तर तुमच्यावर आम्ही २०० टक्के टॅरिफ लादू. दोन्ही देश आमच्याशी व्यापार करतात. पैशांचा विषय आल्यानंतर दोन्ही देशांनी संघर्ष थांबविण्याचा निर्णय घेतला, असे ट्रम्प यांनी म्हटले. ट्रम्प म्हणाले, जेव्हा व्यापाराचा विषय आला, तेव्हा दोन्ही देशांनी संघर्षाची भूमिका बदलली आणि दोन-तीन दिवसांतच हा संघर्ष निवळला.
संघर्ष थांबल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आमच्या चीफ ऑफ स्टाफसमोर सांगितले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हा संघर्ष थांबवून २.५ कोटी लोकांचे जीव वाचवले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले. तसेच या संघर्षादरम्यान ११ महागडी लढाऊ विमाने पाडली गेली, असा नवा दावा यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा




