‘मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण..’; अजित पवारांचं विधान चर्चेत

मुंबई | राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भात खलबतं सुरु आहेत. राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? यावरही चर्चा सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाची आस आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली आहे. गाडी पुढे जावी याचा मी प्रयत्नही करतोय. पण संधीच मिळत नाही. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद आलं होतं. परंतु, त्यावेळी पक्ष नेतृत्त्वाने या पदावरचा दावा सोडला आणि काँग्रेसला संधी दिली. जो कोणी खुर्चीवर बसतो त्याला ही खुर्ची आवडते. तुम्हालाही तुमची खुर्ची आवडत असेल ना. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करावेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची एकच जागा आहे आणि १४५ मॅजिक फिगर आहे. जो १४५ मॅजिक फिगर गाठेल तो मुख्यमंत्री बनेल.
हेही वाचा – ‘मला माफ करा, मी माझे शब्द..’; कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून कंगनाने मागितली माफी
२०१९ मध्ये जिंकलेल्या जागांवर भाजपा जागा लढवणार आहे. तसंच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही हेच सूत्र आहे. त्यामुळे २०० जागांवर जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट आहे. उर्वरित ८८ जागा मित्रपक्षांमध्ये विभागल्या जातील, असं अजित पवार म्हणाले.
तुमच्या समोर शेवटच्या रांगेत शरद पवार बसले आहेत, असं समजा. त्यांना तुम्ही काय सांगाल? असा प्रश्नही अजित पवारांना आज विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय बोलणार? मी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालूनही पाहू शकत नाही. मी मान खाली घालेन.





