पवना नदी प्रदूषणाविरोधात अमरण उपोषणाचा तिसरा दिवस; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
माजी नगरसेवक तुकाराम महादू भोंडवे यांचे आंदोलन तीव्र; तीन दिवस उलटूनही ठोस कारवाई नाही, “नदी वाचवा”ची हाक बुलंद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरणाच्या ज्वलंत प्रश्नावर सुरू असलेल्या अमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस उजाडला असून, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सांडपाणी थेट पवना नदीत सोडले जात असल्याच्या निषेधार्थ माजी नगरसेवक तुकाराम महादू भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सिम्बॉयसिस कॉलेजजवळ ओढ्याच्या पुलाजवळ अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही.
दरम्यान, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सचिव जालिंदर काटे यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे. संतोष भोंडवे, अंकुश भोंडवे, राजेंद्र भोंडवे आणि दादाजी पगार, नंदकुमार बहिरट, राजू राक्षे उपस्थित होते.
पवना नदी ही शहराची जीवनवाहिनी असताना, त्यात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : ‘कोविड लसीमुळेच वडिलांचा मृत्यू’; शेन वॉर्नच्या मुलाचा खळबळजनक दावा
दरम्यान, उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असताना उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तरीही ना प्रशासन, ना लोकप्रतिनिधी यांनी या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिलेले दिसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
“नदी वाचवा, शहर वाचवा” अशी घोषणा देत नागरिकांनी या आंदोलनाला मोठा पाठिंबा दर्शवला असून, लवकरात लवकर ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शहराच्या पर्यावरणाचा प्रश्न आता गंभीर वळणावर पोहोचला असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांच्या मागण्या…
1. पवना बंद जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करावे.
2. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करावेत.
3. ओढा- नाल्यातून येणारे सांडपाणी नदी पात्रात सोडण्यास प्रतिबंध करावा.
4. गृहप्रकल्पांतील एसटीपी प्लँट कार्यान्वयीत करावेत. त्यासाठी प्रशासनाने नियमावलीची अंमलबजावणी करावी.
पवना नदीत सोडले जाणारे सांडपाणी हा केवळ पर्यावरणाचा नाही तर नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न आहे. माजी नगरसेवक तुकाराम महादू भोंडवे यांनी सुरू केलेल्या या अमरण उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.
– जालिंदर काटे, सचिव, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा.





