शहरामध्ये निर्जंतुकीकरण करुनच पाणीपुरवठा; कोणतीही फिल्टर मशीन बंद नाही !
नागरिकांनी खोट्या ‘एसएमएस’ वर विश्वास ठेऊ नये; महापालिका जलशुद्धीकरण केंद्राकडून आवाहन
पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरण करुन विविध शास्त्रोक्त प्रक्रियांचे अवलंब करुनच शहरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येते. नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करण्यात येत असून शहरामध्ये जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर मशीन बंद असल्याचा व त्यामध्ये बिघाड झाल्याचे ‘एसएमएस’ सध्या नागरिकांपर्यंत पोहोचत असून पाणी निर्जंतुकीकरण न करताच सोडण्यात येणार असल्याचेही त्याद्वारे सांगण्यात येत आहे. असे एसएमएस खोटे व जाणीवपूर्वक पसरविण्यात येत असून अशी कोणतीही परिस्थिती नाही. जलशुध्दीकरण केंद्रातील फिल्टर हाऊस सुरु असून नागरिकांना शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे, असे जलशुध्दीकरण केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा : ‘विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रात सन्नाटा पसरला’; राज ठाकरेंकडून शंका उपस्थित
“सध्या शहरामध्ये फिल्टर मशीन बंद असल्याचे व निर्जंतुकीकरण न करता पाणी सोडण्यात येणार असल्याचे ‘एसएमएस’ पाठविले जात असून यामध्ये कोणत्याही प्रकारे सत्यता नाही. जलशुध्दीकरण केंद्राकडून पाणी निर्जंतुकीकरणासाठी आवश्यक असणारी टी.सी.एल पावडर वापरण्यात येत आहे. नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्राकडून अत्यावश्यक प्रक्रियांचा अवलंब करुनच पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी खोट्या माहितीवर विश्वास न ठेवता आपणास येणारे पाणी अशुध्द असल्याचा संभ्रम दूर करावा. सध्या पाठविल्या जाणाऱ्या खोट्या ‘एसएमएस’ पाठविणाऱ्याचा शोध घेवून संबंधितांवर सायबर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”
-प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता (१), पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.





