भोसरी विधानसभा : ‘‘आम्ही फक्त पायरी म्हणून राहायचे का?’’ शिवसेना नेत्या सुलभा उबाळे यांची खंत
निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळावा, पक्षश्रेष्ठींकडे मागणी

भोसरीसह पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारीवरुन वादाची शक्यता
पिंपरी : पक्षवाढीसाठी प्रवेश होत असतील, तर त्याचे स्वागत आहे. मात्र, निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी प्रवेश होणार असतील, तर निष्ठावंतानाही विश्वासात घेतले पाहिजे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिरुर लोकसभा मतदार संघातून डॉ. अमोल कोल्हे निवडणूक लढले. त्यावेळी राष्ट्रवादीचा एकही मोठा पदाधिकारी काम करण्यासाठी तयार नव्हता. शिवसैनिकांनी ही निवडणूक हाती घेतली आणि निष्ठेने काम केले. मात्र, आता खासदार अमोल कोल्हे भेटायलासुद्धा तयार नाहीत. आम्ही फक्त पायरी म्हणून रहायचे काय? अशी खंत शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी व्यक्त केली आहे.
तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. याबाबत निष्ठावंतांना विश्वासात घ्यावे. या करिता मेल पाठवला आहे. त्यांची वेळ मिळाली की आम्ही सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असेही उबाळे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – पिंपरी विधानसभा : ठाकरे गटात उमेदवारीसाठी ‘इनकमिंग’; निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर!
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे अस्तित्व संपवण्यासाठी काही राजकीय नेत्यांनी अभद्र युती केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निवडून येणारी जागा घ्यावी. तसेच, उमेदवारी आणि निवडणुकीसाठी ‘इनकमिंग’ करताना निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातील निष्ठावंतांकडून केली जात आहे.
भोसरीतील उमेदवारीवरुन पेच होण्याची शक्यता…
भोसरी विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या निमित्ताने अजित गव्हाणे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि निवडणुकीची तयारी केली. तसेच, भाजपातील माजी नगरसेवक रवि लांडगे यांनीही भाजपातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. गव्हाणे आणि लांडगे हे दोन्ही उमेदवार विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या निष्ठावंत म्हणून सुलभा उबाळे यांनीही निवडणुकीची तयारी केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पिंपरी आणि भोसरी हे दोन मतदार संघ ठाकरे गटाला मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे दोन्हीपैकी किमान एका मतदार संघामध्ये निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा निष्ठावंतांमधून व्यक्त होत आहे. परिणामी, भोसरी आणि पिंपरीतील महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरुन पेच निर्माण होईल, असे राजकीय जाणकार सांगतात.





