आरोप सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील- आदिती तटकरे
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाबाबत तटकरेंची प्रतिक्रिया
पिंपरी : अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या आरोपांची चौकशी करत आहेत. आरोप सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील असे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
पिंपरी- चिंचवडमध्ये एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने आदिती तटकरे आलेल्या असताना त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कृषी खात्याशी संबंधित खरेदी प्रकरण आरोप होत आहेत या प्रकरणे विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू
आदिती तटकरे पुढे म्हणाल्या राजकारणात आरोप प्रत्यारो होत राहतात त्यांची चौकशी होऊन कारवाई होणे अपेक्षित आहे. आमची महायुती असल्याने मतमतांतरे असू शकतात. यावर तिन्ही पक्षाचे नेते मार्ग काढतील. यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबद्दल प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या, रायगड प्रमाणेच नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत तोडगा काढला जाईल. असे निर्णय घेण्यासाठी वेळ लागतो. या निर्णयामुळे जिल्ह्याचा विकास थांबणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे देखील तटकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेतील निकषांमध्ये बदल केलेला नाही. ज्यावेळी ही योजना आणली तेव्हापासून ते निकष लावण्यात आलेले आहेत. ऑगस्ट महिन्यात देखील ७० ते ७५ हजार अर्ज अपात्र ठरवले होते. अचानकपणे लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त केलेली नाही. आम्हाला काही तक्रारी आल्याने त्यात आम्ही तपासणी करत आहोत. ही योजना थांबणार नाही. विरोधक लाडकी बहिण योजनेबद्दल अपप्रचार करत आहेत.





