CAA: दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही हाय अलर्ट जारी…

मुंबई | महाईन्यूज |
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खबरदारी बाळगत आहे, असं गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं. तसेच आझाद मैदानचा परिसर वगळता मुंबईत इतरत्र कोणत्याही ठिकाणी निदर्शने करण्याची कोणालाही परवानगी देण्यात येणार नाही, असंही या सूत्रांनी सांगितलं. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये यासाठीच हा हा मज्जाव करण्यात आल्याचंही सांगण्यात आलं.

दरम्यान, दिल्लीत कालपासून पुन्हा एकदा सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. काल दिल्लीच्या ईशान्य भागात या आंदोलनाचं पर्यावसान हिंसाचारात झालं. त्यात ७ जण ठार झाले असून ६० जण जखमी झाले आहेत. या भागात अनेक ठिकाणी जाळपोळ झाली असून सरकारी मालमत्तांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आलं आहे. त्यामुळे दिल्लीच्या मौजपूर, जाफराबाद, सीलमपूर, गौतमपुरी, भजनपुरा, चांदबाग, मुस्तफाबाद, वजीराबाद आणि शिव विहार या ९ संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणार बंदोबस्त तैनात केला गेला आहे. या भागांना छावणीचं स्वरूप आलंय. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात यावी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्च स्तरीय बैठक बोलवून त्यात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.





