कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळा वादात अडकली
टिळा-टिकली लावल्यास थेट शिक्षा, ‘गांधी’ शाळेचा अजब फतवा
मुंबई : कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी शाळा वादात अडकली आहे. धार्मिक सहिष्णुता जपण्याच्या नावाखाली ही शाळा हिंदूच्या धार्मिक आस्था दुखावत असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांनी टिळा,टिकली लावल्यास अथवा हातात धागा, बांगडी घातल्यास त्यांना शिक्षा देण्यास येईल असा अजब फतवा या शाळेने काढला. त्याविरोधात पालकांचा संताप अनावर झाला. त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तक्रार दिली. तर या प्रकाराविरोधात उद्धव सेना सुद्धा आक्रमक झाली. त्यांनी व्यवस्थापनासह मुख्यध्यापकांना धारेवर धरले. यावेळी मोठा तणाव झाला. पोलिसांचा बंदोबस्त मागवण्यात आला.
कल्याणच्या शाळेचा अजब फतवा
शाळेत विद्यार्थ्यांना टिळा-टिकली आणि हातात धागे बांधण्यास शाळेने बंदी घातली. जर कोणी टिळा, टिकली अथवा हातात धागा घालून आले तर त्याला शिक्षा देण्यात येईल असा फतवा कल्याणमधील श्रीमती कांताबेन शांतीलाल गांधी स्कूलने काढला. त्यामुळे पालक संतप्त झाले. त्यांनी या शाळेची तक्रार थेट कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे केली.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
अगोदर फतवा मग कानावर हात
हा अजब फतवा काढल्यानंतर वातावरण तापले. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे दिसताच या शाळेच्या व्यवस्थापनाने मग साळसूद भूमिका घेतली. त्यांनी असा काही प्रकार केला नसल्याची भूमिका घेतली. घाबरलेल्या व्यवस्थापनाने मग आपल्या भूमिकेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुठला फतवा काढला नाही. शाळेत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी फक्त सूचना दिल्या असा कांगावा या शाळेने केला. पण यातून शाळा प्रशासनाने फतवा काढल्याचे मान्य केले.
कडा व बांगडीने इजा होऊ नये यासाठी आम्ही ते बंद केलेले आहे त्याचबरोबर टिळा धागे यामुळे शाळेत धार्मिक वाद होत असल्याने त्यादेखील काढाव्या अशा सूचना पालकांना दिल्याचे शाळेचे म्हणणे आहे. शाळेचे सिक्रेटरी मनोहर पालन, स्वप्नाली रानडे रानडे शाळा डायरेक्ट आणि मुख्याध्यापक संजय पाटील यांनी त्यांची बाजू मांडली.
ठाकरे गटाने विचारला जाब
दरम्यान हा प्रकार समजताच उद्धव ठाकरे गटाने शाळेत धाव घेत व्यवस्थापनाला जाब विचारला. शाळा प्रशासनाचे संचालक मुख्याध्यापक आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ठाकरे गटा आक्रमक झाला. आम्ही इतर धर्माला सांगतो का टिळा किंवा टिकली लावा. त्यांच्यासाठी आमच्या धर्मावर बंदी का? असा थेट सवाल त्यांनी विचारला. आम्ही सर्व धर्माचा आदर करतो असे म्हणत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. बैठकीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शाळेचे संचालक,मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. तर यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त दिसून आला.





