‘माझ्याकडे फक्त तीनच पर्याय होते’; खासदार राघव चड्ढा यांनी सांगितलं ‘आप’ सोडण्यामागचं कारण

नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासह राज्यसभेतील सात खासदारांनी २४ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षांतरामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला असतानाच, आता राघव चड्ढा यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत आम आदमी पक्ष सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. “मी राईट मॅन इन राँग पार्टी होतो,” असं म्हणत त्यांनी पक्षातील ‘टॉक्सिक’ वातावरणावर जोरदार टीका केली आहे.
“गेल्या तीन दिवसांपासून मला अनेकांचे फोन, मेसेज आले. अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या, तर काही जणांना माझ्या या निर्णयाच्या मागचं कारण जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ त्या सर्वांसाठीच आहे. राजकारणात येण्याआधी मी एक चार्टर्ड अकाउंटंट होतो. माझ्या समोर एक चांगलं करिअर होतं, तरीही मी माझं करिअर सोडलं आणि राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मात्र, मी माझं करिअर करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही”, असं राघव चड्ढा यांनी म्हटलं आहे.
“मी एका (आम आदमी पक्ष) पक्षाचा सदस्य झालो. त्यानंतर त्या पक्षाला मी माझ्या आयुष्यातील १५ वर्ष दिले. मात्र, आजच्या घडीला आम आदमी पक्ष हा जुना आम आदमी पक्ष राहिलेला नाही. या पक्षात एक टॉक्सिक वातावरण निर्माण झालेलं आहे. काम करण्यापासून रोखलं जात आहे, संसदेत बोलण्यापासून रोखलं जात आहे, आज आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांच्या हातात गेला आहे, जे लोक देशासाठी नाही, तर स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत”, अशी टीका राघव चड्ढा यांनी केली.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी फेडरेशन ‘कटिबद्ध’!
“गेल्याकाही वर्षांपासून मला असं वाटत होतं की ‘राईट मॅन इन राँग पार्टी’. मी चुकीच्या पक्षात आहे. त्यामुळे माझ्यासमोर फक्त तीनच पर्याय होते. त्यातील पहिला पर्याय होता की, मी राजकारण सोडावं, दुसरा पर्याय होता की, मी याच पक्षात राहून पक्षातील काही गोष्टी ठीक करण्यासाठी प्रयत्न करावेत. पण ते काही झालं नाही. त्यानंतर माझ्यासमोर तिसरा पर्याय होता की, मी माझा अनुभव घेऊन सकारात्मक राजकारण करावं आणि दुसऱ्या पक्षात जाऊन एक सकारात्मक राजकारण करावं. त्यामुळे फक्त मी एकट्याने नाही, तर माझ्यासह एकूण सात सदस्यांनी हा निर्णय घेतला”, असं राघव चड्ढा यांनी सांगितलं आहे.
“मी चुकीचा असू शकतो. पण सात-सात लोक चुकीचे कसे असतील? एवढंच नाही तर जे चांगले उच्चशिक्षित लोक होते, ते देखील या पक्षाला (आप) याआधी सोडून गेलेले आहेत. मग ते देखील चुकीचे होते का?”, असा सवाल राघव चड्ढा यांनी विचारला आहे.
“तुम्ही असं समजा तुमच्या ऑफिसमध्ये काम करत असताना ऑफिसमधील वातावरण ‘टॉक्सिक’ झालं तर तुम्ही किती काम करू शकाल? जर तुम्हाला काम करण्यापासून रोखलं जात असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकाल का? त्यामुळे अशा परिस्थिती योग्य निर्णय हा असतो की आपण ते वर्कप्लेस सोडून दिलेलं कधीही योग्य. त्यामुळे मी देखील अशाच प्रकारचा निर्णय घेतला”, असं राघव चड्ढा यांनी सांगितलं आहे.





