breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, २४ डिसेंबर नंतर..

मुंबई : आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. या लाठीमाराबाबत एक मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केली. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे.

हेही वाचा  –  विराट कोहली आणि नवीन उल हक वादावर गौतम गंभीरचं मोठं विधान; म्हणाला.. 

माझा मराठा समाज गरीब असला, शेतात राबणारा असला तरी त्याचे सरकार, लोकप्रतिनिधीवर बारकाईने लक्ष आहे. एकदा २४ डिसेंबरची मुदत होऊन जाऊ द्या. मग पुढे महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे? हे त्यांना दाखवून दे. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. आमचे आंदोलन शांततेतच होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू, असं मनोज जरांगे म्हणाले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जालन्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनाबाबतची माहिती दिली. आंदोलकांपेक्षा पोलिसच अधिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतचा प्रश्न विचारला असता जरांगे पाटील म्हणाले, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर नाही आले, तर त्यांना मराठा काय आणि महाराष्ट्र काय हे लक्षात येईल. कुणाचे तरी ऐकून (भुजबळ) फडणवीस यांनी भूमिका बदलली, याचा त्यांना पश्चाताप होईल.

आम्ही मागेही दूध का दूध, पाणी का पाणी करू. दोन तीन दिवस वाट पाहू. फडणवीस यांना मराठे पुन्हा एकदा उघडे पाडणार, ते खोटे बोलले आहेत. त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार. त्यांनी आम्हाला समजून घ्यावे. फडणवीस यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मराठ्यांचा विचार करावा. जर आमची गरज नसेल तर पुढे आम्ही कोण आहोत? हे दाखवून देऊ, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button