EVM ला नव्याने बसवले जाणारे ‘पाडू’ मशीन नेमकं काय? कसं करणार काम?

Election Commission Add New ‘device’ called ‘Padu’ To EVM Machines : महानगर पालिकांसाठी उद्या (दि.15) मतदान पार पडणार आहे. मात्र यावेळी निवडणूक आयोग EVM मशीनला एक नवीन ‘डिव्हाइस’ (उपकरण) जोडणार आहे. ज्याचे नाव प्रिटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट म्हणजेच पाडू असे आहे. मात्र, हे नवीन मशीन ईव्हीएमला जोडल्यानंतर कसं काम करणार ते अनेकांना माहिती नाहीये. त्याबद्दल जाणून घेऊया…
मतदानाच्या दिवशी ईव्हिएमला नव्याने जोडले जाणारे पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट आहे. हे एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे. मतदाराला मतदान करताना किंवा मतदान प्रक्रियेदरम्यान अधिक स्पष्ट आणि मोठ्या डिस्प्लेवर माहिती दाखवण्यासाठी ‘पाडू’ मशीन आहे. ‘पाडू’ हे VVPAT सारखं पावती देणारं यंत्र नाही. तर, मुख्यतः ऑक्सिलरी डिस्प्ले देणारं हे यंत्र आहे. जे मतदान प्रक्रिया अधिक सोपी आणि दृश्यमान बनवण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.
मतमोजणी करताना पाडू मशीन सर्वात आधी कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मते तपासली जातात. मात्र या जोडणीनंतरही निकाल पाहण्यात अडथळे निर्माण होत असतील तर ‘पाडू’ यंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते.
PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक (इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.
हेही वाचा – आजपासून बदलणार पंतप्रधानांच्या नवीन कार्यालयाचा पत्ता ; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये?
निवडणूक आयोग EVM मशीनला एक नवीन ‘डिव्हाइस’ जोडणार आहे. मात्र, या तांत्रिक बदलाबाबत आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षाला विश्वासात घेतलेले नाही किंवा तशी पूर्वकल्पना दिलेली नाही. हे नवीन मशीन नेमके दिसते कसे, याचे काम काय आणि ते ऐनवेळी का जोडले जात आहे, याचे उत्तर आयोगाकडे नाही,” असे राज ठाकरे म्हणाले. नवीन मशीन राजकारण्यांना दाखवावंसंही नाही वाटलं. यात गडबड होणार नाही हे कशावरून? असेही राज म्हणाले.
हे नवीन काय युनिट आणले आहे ते आम्हाला माहिती नाही, जनतेलाही माहिती. हे दाखवावे, सांगावे यासाठी निवडणूक आयोग तयार नाहीये. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे त्यांना हवे ते करत आहेत. उद्धव ठाकरेंनी याबाबतचे पत्र पाठविले आहे. त्यावर ते बोलायला तयार नाही, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये प्रचार झाल्यानंतर एक दिवसामध्ये वेळ असतो. आतापर्यंत मतदानाच्या आदल्या दिवशी प्रचार नव्हता. निवडणुकीची प्रथा मोडली. सरकारला जे हवं त्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय. पत्रके वाटू शकत नाही पण पैसे वाटू शकतात का?, ही मुभा आताच का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.




