आता फक्त ५० रुपयांत जा किल्ले रायगडावर, महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा

Raigad Fort: किल्ले रायगडावर जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रायगडवर रोपवेने जाणं आता अधिक सोपं आणि कमी खर्चिक होणार आहे. कारण रोपवेचे तिकीट प्रतिव्यक्ती ३५० रुपयांवरून आता फक्त ५० ते १०० रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोपवेचे तिकीट कमी केल्यामुळे आता रायगडावर महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या कोणत्याही वयाच्या शिवभक्तांना महाराजांचे दर्शन घेणं अधिक सोपं होणार आहे.
रायगडावर रोपवेनं जाण्यासाठी जास्त पैसे आकारले जात आहेत. ३५० रुपये प्रतिव्यक्ती पैसे मोजावे लागत आहे. ऐवढे पैसे सर्वसामान्यांना परवडणारे नसल्यामुळे अनेक शिवभक्त गडावर पायी चालत जातात. पण आता या शिवभक्तांना पायी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. कारण रोपवेचा खर्च ३५० रुपयांऐवजी फक्त ५० ते १०० रुपये द्यावे लागणार आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या खिशाला हे तिकीट परवणारं असणार आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात शिवभक्तांना रायगडावर जाऊन महाराजांचे दर्शन घेता येणार आहे.
हेही वाचा – PF मधील 100 टक्के रक्कम कधी काढता येते? 75 टक्के कधी मिळते? जाणून घ्या महत्त्वाचे नियम
रायगडावर सर्व शिवभक्तांना स्वस्तात रोपवेचा प्रवास करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वाचा निर्णय घेतला. महाराष्ट्र शासनाने दुर्गराज रायगडावर नवीन अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पुरातत्व विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. लवकरच प्रत्यक्ष रोपवे उभारणीच्या कामास सुरुवात केली जाणार आहे. या रोपवेमुळे सध्या आकारल्या जाणाऱ्या प्रतिव्यक्ती ३५० रुपयांऐवजी पर्यटकांना फक्त ५० ते १०० रुपयांत गडावर शिवभक्तांना जाता येणार आहे. संवर्धनाच्या कामांसाठी सध्याच्या रोपवेकडून आकारल्या जाणाऱ्या कोट्यवधी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड विकास प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, रायगडावर सध्या कार्यरत असलेल्या खासगी मालकीच्या रोपवेकडून प्रतिव्यक्ती ३२५ रुपये भाडे आकारले जात आहे. तसेच रायगड विकास प्राधिकरणास संवर्धन कामांकरिता गडावर नेण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या साहित्यांना प्रतिकिलो ६.३ रुपये दर आकारला जात आहे. यामुळे गडावरील कामांना सरासरीपेक्षा दुप्पट ते तिप्पट खर्च येत आहे. महाराष्ट्र सरकार आता स्वस्तात रोपवे सुविधा उपलब्ध करून देत असल्यामुळे सर्वांनाच त्याचा फायदा होणार आहे.





